लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत जिल्ह्यातून २१ हजार ८० विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती. कोरोनामुळे परीक्षा रद्द केल्याने अंतर्गत मूल्यमापनानुसार निकाल घोषित करण्यात आला. सर्वच विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल १०० टक्के लागला आहे. जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये २७ हजार ४२० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊनही ६,३४० जागा शिल्लक राहणार असून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरळीत होणार आहे.
जिल्ह्यात अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ६१, विना अनुदानित ५१, स्वयंअर्थ सहाय्यितची २९ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातून कला शाखेची एकूण ७,३६०, विज्ञान शाखा ७,६८०, वाणिज्य ८,३६०, संयुक्त ४,०२० इतकी प्रवेश क्षमता आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा विज्ञान शाखेकडे अधिक असल्याने विज्ञान शाखेसाठी प्रवेशाची यादी वाढते. अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच औद्योगिक प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतात. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेशाची संख्या आणखी कमी होणार आहे. क्षमतेपेक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. शहरातील, वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पालकांचा, विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्यामुळे विज्ञान प्रवेश तेवढाच अवघड होतो. प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या तारखांबाबत सूचना नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.
शहराकडे ओढा
व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे. दहावीनंतर डिप्लोमाकडे विद्यार्थी प्रवेश घेतात. अनेक विद्यार्थी मुंबई, पुणे तसेच अन्य शहरातील महाविद्यालयाकडे जातात. ग्रामीण भागात शाळेशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयापेक्षा शहरातील महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी धडपडतात. आवडीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी पालक, विद्यार्थ्यांचा आग्रह असल्याने प्रवेश प्रक्रिया जटिल बनते.
शहरी भागासाठी ऑनलाईन प्रवेश शक्य आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीसंख्या माेजकीच आहे. ग्रामीण भागासाठी ऑफलाईन प्रवेश असावेत. तत्पूर्वी सीईटीचे धोरण स्पष्ट व्हावे.
- एस.व्ही. पाटील, प्राचार्य, मासाहेब मीनाताई ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, नेवरे
दहावीच्या परीक्षेचा निकाल तर जाहीर झाला आहे. मात्र प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. याबाबत अद्याप तारीख घोषित केलेली नाही. शहरात गुणवत्ता यादीमुळे प्रवेश मिळणे शक्य नसताना, ग्रामीण भागातून प्रवेश सहज शक्य आहे. परंतु सीईटीनंतरच यावेळी प्रवेश होणार आहे. त्यामुळे परीक्षेची तारीख लवकर जाहीर करावी.
- मनाली मोरे, विद्यार्थी
विज्ञान, वाणिज्य शाखेसाठी शहरात प्रवेश मिळणे अशक्य होते. त्याचवेळी ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयातून प्रवेश सहज होऊ शकतो. परंतु यावेळी चित्रच बदलले आहे. प्रवेशापूर्वी सीईटी परीक्षा ग्रामीण असो वा शहरी भागात द्यावीच लागणार आहे. नंतरच प्रवेश होणार असून याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात.
- साहिल जोशी, विद्यार्थी
दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होत असे, मात्र आता सीईटीनंतरच प्रवेश होणार आहेत. त्याबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे. सूचना प्राप्त होताच प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
- विशाखा सकपाळ, उपप्राचार्या
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी.