खाडीपट्टा : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या चायनीज हॉटेल्स मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आली असून, ती फक्त ग्रामपंचायतीच्या परवानगीने चालू असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. वास्तविक चायनीजसारखा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचा ना हरकत दाखला सक्तीचा असल्याचा शासनाचा नियम आहे. मात्र, सध्या ग्रामीण भागात चालू असणारे शाळेजवळ किंवा बसस्थानकाजवळ हॉटेल्स, चॉयनीज चालवणाऱ्यांकडे अन्न व औषध प्रशासनाचे कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास येत आहे. सर्वत्र प्रदूषण व आता चायनीजसारखे अतिजलद मसाले वापरणारे खाद्यपदार्थ यामुळे खाणाऱ्यांमध्ये रोग पसरण्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात ताप, टी. बी. यांसारख्या रोगाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण आहेत. खाद्यपदार्थ विकणाऱ्यांकडे कोणतेही आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र तसेच अन्न व औषध प्रशासनाचे ना हरकत दाखले नसल्याने तो विकणारा नागरिकांच्या जीविताशी खेळत आहेत. याबाबत तहसीलदार खेड यांच्याशी संपर्क साधला असता शहरासह ग्रामीण भागातील सर्व हॉटेल्स, चायनीज स्टॉल्सची तपासणी करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. खाडीपट्ट्यातील मंडल अधिकारी परवानगीच्या नावावर मारताहेत चायनीजच्या पदार्थावर ताव व कागदपत्राच्या तपासणीच्या नावावर कागदपत्र ताब्यात घेऊन चायनीज मालकांवर कारवाईच्या नावावर आपला स्वार्थ साधत आहेत, असे एका चायनीज मालकाने सांगितले. चायनीज पदार्थावर खवैय्ये ताव मारतात. मात्र, हे पदार्थ करण्यासाठी त्यास आवश्यक तो परवाना गरजेचा आहे. मात्र, अनेक ठिकाणी तो घेतलेला दिसत नसल्याने त्याबाबत कोणती कार्यवाही करणार असा प्रश्न विचारला जात आहे. खेडचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहरासह ग्रामीण भागातील सर्व हॉटेल्स, चायनीज स्टॉल्सची पाहणी करणार असल्याचे यावेळी सांगितले. (वार्ताहर) हॉटेल्स, चायनीज आदी खाद्य पदार्थ विकणाऱ्या मालकांकडे अन्न व औषध प्रशासनाचे नाहरकत दाखल्याशिवाय परवानगी देता येत नाही. मात्र, आम्ही फक्त सांडपाणी आदीसह इमारतीबाबत चौकशी करतो. मात्र, दोषींवर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार तहसीलदारांना आहेत. - आर. एस. रेडेकर,आरोग्य सहायक, जिल्हा परिषद, रत्नागिरी
चायनीज सेंटर्सकडे प्रमाणपत्रच नाही?
By admin | Updated: August 24, 2014 22:38 IST