लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनावरील लस येण्याआधी आपल्याला कोरोना होऊन गेला आहे का, कोरोना
झाल्यानंतर आपल्यामध्ये ॲण्टीबॉडीज तयार झाल्या आहेत का, हे पाहण्यासाठी ॲण्टीबॉडीज टेस्ट करण्यात येते. मात्र, कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर ही लस घेतल्यावर आपल्यामध्ये रोगप्रतिबंधक शक्ती तयार होते, हे बहुसंख्य लोकांना माहीत झाल्याने आता ॲण्टीबॉडीज चाचणी करायची कशासाठी, असे म्हणत आता नागरिकांनी या चाचणीकडे दुर्लक्ष केले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी कोरोनाच्या चाचणीबरोबरच कोरोना होऊन गेला आहे किंवा नाही, कोरोना होऊन गेला आहे तर आपल्या शरीरात ॲण्टीबॉडीज तयार झाल्या आहेत का, हे पाहण्यासाठी ॲण्टीबॉडीज चाचणी केली जात असे. कोरोना चाचणी करण्यासाठी नागरिक पुढे येत नसत. मात्र, ॲण्टीबॉडीज चाचणी करून घेत.
विशेषत: आरोग्य कर्मचारी, कोरोनाशी लढणारे पहिल्या फळीतील कार्यकर्ते यांच्यापैकी बहुसंख्य जणांची ॲण्टीबॉडीज चाचणी करण्यात आली होती.
मात्र, जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. कोविशिल्ड अथवा कोव्हॅक्सिन या दोन्हींपैकी कुठलीही लस घेतली तरीही आपली प्रतिकारशक्ती वाढणार आहे, हे आता नागरिकांना माहीत झाल्याने सध्या या ॲण्टीबॉडीज चाचणीकडे लस घेतलेल्या नागरिकांकडून पाठ फिरवली जात आहे. सध्या ही चाचणी होत नाही.
सध्या तपासण्या नाहीच
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींपासून संसर्ग वाढण्याचा धोका अधिक होता. अशा व्यक्तींमुळे कोरोना कुणाला झाला आहे, हे कळण्यासाठी आरोग्य क्षेत्र तसेच पहिल्या फळीत राहून काम करणाऱ्या व्यक्तींची ॲण्टीबॉडीज चाचणी करण्यास सुरुवात झाली. यामुळे लक्षणे नसली तरी या चाचणीत कोरोना झाल्याचे समजत असे. सध्या लसीकरण सुरू असल्याने या चाचण्यांकडे पाठ फिरली आहे.
तरुणांची संख्या जास्त
कोरोनाची लक्षणे नसलेल्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे त्यांच्यापासून घरातील ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होऊ लागला. परिणामी यात जेष्ठ अधिक बाधित झाले. त्यामुळे रुग्णसंख्या वाढू लागली. त्याचबरोबर वेळेवर उपचारासाठी दाखल न झाल्याने अनेक ज्येष्ठांचा मृत्यू झाला. त्यामुळे पहिल्या लाटेवेळी ॲण्टीबॉडीज चाचणी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली.
जिल्हा रुग्णालयात ॲण्टीबॉडीज चाचणी करण्याचे यंत्र आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी आरोग्य कर्मचारी तसेच पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांची ॲण्टीबॉडीज चाचणी केली जात होती. यातून आपल्याला कोरोना झाला होता की नाही, हे कळते. आता लसीकरण सुरू झाल्यापासून ही चाचणी करायला कुणी पुढे येत नाही.
- डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी