दुसऱ्या सूत्राप्रमाणे चिखलणी करून खाचर तयार केल्यानंतर तुसाची काळी राख वापरून तयार केलेल्या भाताच्या ३-४ आठवड्यांच्या सशक्त रोपांची नियंत्रित लावणी करावी. म्हणजेच रोपे सुधारित अंतरावर लावावी. त्यामुळे आव्यांची संख्या प्रतिचाैरस मीटरला २५ ठेवली जाते. सुधारित जातींना स्थानिक भातापेक्षा जास्त फुटवे येतात. त्यामुळे प्रत्येक आव्यात २ ते ३ रोपांपेक्षा जास्त रोपे लावू नयेत. नियंत्रित भातलावणीसाठी खालील दोन पद्धती विकसित केलेल्या आहेत.
बांबू मार्गदर्शक लावणी पद्धत
एक चार मीटर लांबीचा सरळ बांबू, साधी अगर प्लास्टिकची सुतळी व कोयता इतके साहित्य असले की, शेतकरी स्वत:च्या शेतावरच बांबू मार्गदर्शक तयार करू शकतो. बांबू मार्गदर्शकाची लांबी उपलब्ध असलेल्या कामगारांच्या संख्येनुसार (एका कामगारास १४५ ते १८५ सेंटीमीटर) कमी-अधिक ठेवावी. बांबू मार्गदर्शक वापरून शेतकरी फक्त दोन कामगारांच्या मदतीने उत्तम लावणी करू शकतो.
दोन ओळी लावणी पद्धत
ही लावणी पद्धत पूर्वी जपानी लावणी पद्धतीप्रमाणेच आहे. फक्त लावणीस कमी मजूर लावावेत व चाैथ्या सूत्राप्रमाणे ब्रिकेट खताचा वापर सहज, सोप्या रीतीने करता यावा म्हणून त्या लावणी पद्धतीत खालील सुधारणा करण्यात आल्या आहेत. रोपांमधील अंतर सुधारित २० बाय २० सेंटीमीटर राखण्यासाठी लावणी दोरीच्या खुणांमधील अंतर आलटून-पालटून २५ सेंटीमीटर, १५ सेंटीमीटर असे ठेवले आहे. एकाच वेळी दोन ओळी लावल्या जातात. त्यानंतर कामगार (२० सेंटीमीटर अंतराऐवजी) प्रत्येक वेळी ४० सेंटीमीटर मागे सरकतात.
खताचा कार्यक्षम वापर
ज्या रासायनिक खताच्या वापरामुळे भाताचे उत्पादन लक्षणीय वाढले व भारतात भातामध्ये हरितक्रांती झाली. तीच खते कोकणातील व घाटावरील शेतकरी अद्यापही हव्या त्या प्रमाणात वापरत नाहीत. त्याला कारणे बरीच आहेत. ती महाग आहेत, ती वापरण्यासाठी कार्यक्षम पद्धती नाही. बऱ्याच वेळा भातखाचरात फेकून टाकलेले खत पावसाच्या जोरदार सरीमुळे पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर वाहून जाते. शेतकऱ्यांना परवडेल असे स्फुरद वापरण्याची पद्धत विकसित केली आहे.