लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहराची व्यापारीपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामआळीत सर्वाधिक गर्दी होते आणि तेथेच पादचाऱ्यांसाठीचे फूटपाथच गायब आहेत. काही ठिकाणी व्यापारी आपल्या दुकानातील माल तेथे मांडत आहेत, तर काही दुकानदार त्यावर दुचाकी लावून ठेवत आहेत. त्यामुळे वाहनांच्या गर्दीतून पादचारी, ग्राहकांना सामानाच्या पिशव्या सांभाळत मार्ग काढणे अवघड झाले आहे.
नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेतर्फे लाॅकडाऊनपूर्वी अतिक्रमणे हटवून मार्ग, फूटपाथ मोकळे करण्यात आले होते. अनलाॅकमध्ये हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची वर्दळ सुरू झाली आहे. रामआळीतून गोखलेनाका, धनजीनाका भागात खरेदीसाठी जाता येत असल्याने ग्राहकांची सतत रहदारी सुरू असते. शिवाय चार वाजेपर्यंतच बाजारपेठ खुली असल्याने दुपारी गर्दी बऱ्यापैकी होते. वाहनचालकही वाहने घेऊन रामआळीमार्गे गोखलेनाका, विठ्ठलमंदिर, गाडीतळ, धनजीनाका परिसरात जात असल्याने वाहनांच्या गर्दीतून पादचाऱ्यांना ये-जा करणे अशक्य होत आहे. फळे, सुकामेवा, चप्पल, अन्य छोट्यामोठ्या वस्तूविक्रेते रस्त्याच्या कडेलाच दुकाने थाटत असल्यामुळे पादचाऱ्यांना गर्दीतून मार्ग काढणे अवघड झाले आहे.
रामआळीत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना वाहनांची गर्दी तसेच छोट्या मोठ्या वस्तू विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानामुळे होणाऱ्या गर्दीतून मार्ग काढणे अवघड बनले आहे.
हजारो लाेकांची ये-जा
किराणा, कपडे, चप्पल, भांडी, मिठाई, औषधे, फळे याशिवाय अन्य विविध प्रकारच्या वस्तूंंची खरेदीसह बॅंका, दवाखाने, सरकारी कामानिमित्त शहरात आलेले लोक रामआळीतून ये-जा करतात. दिवसाला पादचाऱ्यासह वाहनचालक मिळून हजारो या मार्गावरून ये-जा करतात. खोदकाम केल्याने रस्ते निकृष्ट झाले आहेत. खराब रस्त्यामुळे वाहनांची गती मंदावत असल्याने गर्दीत भर पडत आहे.
फूटपाथ कागदावरच
रामआळीमध्ये फूटपाथ गायब असून काही ठिकाणी छोट्या विक्रेत्यांनी पथारी पसरली आहे. काही ठिकाणी दुकानांचा माल मांडला जात आहे, तर काही ठिकाणी दुचाकी लावून ठेवण्यात येत असल्याने पादचारी, ग्राहकांना वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत आहे. सणासुदीवेळी तर खरेदीसाठी होणारी गर्दी यामुळे लहान मुलांना घेऊन खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना गर्दीतून वाट काढणे अवघड बनले आहे. फूटपाथ असून नसल्यासारखेच आहेत.
निकृष्ट रस्त्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो, त्यामुळे वाहनांची लागणारी रांग, पादचारी, ग्राहकांची होणारी गर्दी, हातगाडीवाले, छोटे विक्रेते दुकाने लावत असून, अनेक दुकानदार दुकानाबाहेर पसारा वाढवत आहेत. त्यामुळे गर्दीतून मार्ग काढणे अवघड झाले आहे.
- अंजनी पाध्ये, रत्नागिरी
रामआळी खरेदीचा केंद्रबिंदू असल्याने याठिकाणी सतत वर्दळ सुरू असते. नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्ते मोकळे करण्यात येतात. मात्र ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे ठराविक दिवसानंतर परिस्थिती ‘जैसे- थे’ होत आहे. त्यामुळे अतिक्रमणे हटविताना, ती कायमस्वरूपी हटविण्यासाठी कार्यवाही व्हावी.
- सुरेश शिंदे, रत्नागिरी
अतिक्रमणे वाढली
लाॅकडाऊनपूर्वी नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. अनलाॅकनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा विक्रेत्यांनी दुकानांचा पसारा वाढवला आहे. छोट्या विक्रेत्यांनी हातगाडीवर तसेच फूटपाथवर दुकाने थाटली आहेत.