रत्नागिरी : जिल्ह्यातील भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग थेट तक्रारदाराच्या घरापर्यंत जाऊन त्यांची तक्रार घेऊन कारवाई करणार आहे. त्यासाठी ‘लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय आपल्या दारी’ ही संकल्पना राबविणार असल्याची माहिती नूतन पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.
यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून सुशांत चव्हाण यांनी रत्नागिरीत २०१० ते २०१३ या कालावधीत शहर पोलीस ठाण्यात काम केले आहे. आता ते बढतीने पुन्हा ते रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाचे पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. भ्रष्टाचार सर्वत्र असतोच; मात्र समाजाचे काम याेग्य पद्धतीने चालावे यासाठी या प्रकारांना पायबंद घालणे आवश्यक असते. काही अडचणींमुळे किंवा काही गैरसमजुतीमुळे तक्रारदार पुढे येत नाहीत. जोपर्यंत सहन करणे शक्य आहे तोपर्यंत अनेकदा अशा प्रकारांना खतपाणीच घातलेले दिसून येते. मात्र, जनतेच्या अशाच काही अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही खात्यामार्फत काही संकल्पना राबविणार असल्याचे सुशांत चव्हाण यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती अडचणीची आहे. लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे कार्यालय रत्नागिरीत असल्याने अनेकदा तक्रारदार इथे येणे टाळतात, ही परिस्थिीती लक्षात घेऊन आता ‘लाचलुचपत प्रतिबंधक खाते आपल्या दारी’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून, लांब राहणाऱ्या तक्रारदाराने आमच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला तर आमचे पथक तिथे जाऊन त्याची तक्रार दाखल करून घेणार आहे. त्याशिवाय याच माध्यमातून तक्रार दिल्यानंतर जबाब, अन्य कागदपत्रे यासाठी होणारी तक्रारदाराची धावपळही कमी होणार आहे. तक्रारदार व्हाॅटस्ॲपद्वारेही तक्रार देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
कामासाठी पैसे मागणे इतक्यापुरताच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा कारभार मर्यादेत नसून कोणत्याही शासकीय योजनेमध्ये भ्रष्टाचार असेल किंवा कोणी अधिकची संपत्ती जमा केली असेल तर त्याच्याविरुद्धही कारवाई करता येते असेही चव्हाण यांनी सांगितले. नागरिकांनी विश्वासाने आमच्याशी संपर्क करावा आणि भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले असून, यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर, ०२३५२-२२२८९३ या लँडलाइवर किंवा ९८२३२३३०४४ या मोबाईलवर संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.