लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. सध्या जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट ५.७ टक्क्यांवर आला आहे. तरीही तिसऱ्या लाटेचा धोका समोर उभा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा आरोग्य विभाग अधिक सतर्क राहू लागला आहे. या लाटेचा बालकांना असलेला धोका लक्षात घेऊन स्वतंत्र बाल कोविड सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात सध्या काेरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली असली तरीही जागतिक स्तरावर तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात येत आहे. या लाटेचा धोका बालकांना असल्याचे म्हटले जात आहे. त्यादृष्टीने रत्नागिरी शहरात अद्ययावत बाल काेरोना सेंटर्स ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आदी दृष्टीने अद्ययावत तयार करण्यात आले आहेत.
बालके बाधित झाल्यास रत्नागिरी शहरात महिला रुग्णालयात २० बेडचा अतिदक्षता विभाग आणि १२ बेडचा आयसीयू कक्ष तयार ठेवण्यात आला आहे. या बालकांना आपण घरी उपचार घेत असल्याची भावना निर्माण व्हावी, यादृष्टीने या केअर सेंटरमध्ये खेळणीही उपलब्ध करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात ३२ सेंटर्स, १३ हजार ऑक्सिजन बेड्स तयार
जिल्ह्यात सध्या ६ जिल्हा कोरोना रुग्णालये, २५ कोरोना हेल्थ सेंटर आणि ३२ केअर सेंटर्स कार्यरत आहेत. यात सध्या साडेतेरा हजार ऑक्सिजन बेड्स तयार ठेवले असून यापैकी सध्या २,१७३ (१६ टक्के) बेड रिक्त आहेत. अजूनही बेड वाढविले जाणार आहेत.
लहान मुलांसाठी केअर सेंटर
रत्नागिरीत स्वस्तिक रुग्णालय, जिल्हा महिला रुग्णालय या ठिकाणी मुलांसाठी अतिदक्षता विभाग तसेच स्वतंत्र ऑक्सिजन बेड कक्ष तयार करण्यात आला आहे. शिवाजी स्टेडिअम येथे जिल्हा क्रीडा कार्यालय येथेही बाल कोरोना सेंटर उभारण्यात आले असून तालुक्यांमध्येही बाल कोविड सेंटर्स उभारण्यात येत आहेत.
ऑक्सिजन प्लांटची तयारी
जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू झाला असून महिला रुग्णालयाचा प्लांटही येत्या दहा -पंधरा दिवसात सुरू होईल.
दापोली, कळंबणी आणि कामथे उपजिल्हा रुग्णालयात तसेच आणि ओणी ग्रामीण रुग्णालयात पी. एस. ए. प्लांटचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात शासकीय रुग्णालय आणि महिला रुग्णालयात मिळून सुमारे ५०० बेड तयार आहेत.
सध्या जिल्ह्यात ५८३ ऑक्सिजन बेड, १५०३ नाॅन ऑक्सिजन बेड आणि ८७ आयसीयू बेड रिक्त आहेत.
गरजेनुसार बेड वाढविण्यात येणार आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. पाॅझिटिव्हिटी रेट ५.७ टक्क्यांवर आला आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची जिल्हा आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केली आहे. तिसऱ्या लाटेपासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी रत्नागिरी शहरात बाल कोरोना रुग्णालये आणि केअर सेंटर्स सुरू केली आहेत. प्रत्येक तालुक्यातही अशी सेंटर्स सुरू होणार आहेत. कोरोना कमी होत असला तरी नागरिकांनीही तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
- डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी