रत्नागिरी : कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत. कोकण रेल्वेच्या स्थानक परिसरात आणि प्रवासादरम्यान मास्क न वापरणाऱ्या मंडळींवर काेकण रेल्वे प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कोविड रोखण्यासाठी प्रशासन सर्व ती सगळी खबरदारी घेत आहे. कोकण रेल्वेनेही निर्बंधांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. रेल्वेमधून प्रवास करताना मास्क न वापरणाऱ्या मंडळींवर कारवाई सुरू झाली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या सगळ्या गाड्यांमध्ये तपासणी केली जात आहे. मास्क न वापरणाऱ्या मंडळींकडून प्रतिव्यक्ती ५०० रुपये दंड घेतला जात आहे. गाडीप्रमाणे स्थानक परिसरातही मास्क न वापरणाऱ्या मंडळींविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने कारवाई व दंड वसुलीचे अधिकार रेल्वे प्रशासनाला दिले असून, त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.
कोकण रेल्वेत सध्या आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मंडळींना मास्कच्या वापराबरोबरच कोविड प्रतिबंधासाठीचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.