रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरकरवाडा जेटी वर ठेवलेली ४ लाख रुपयांचे किमतीची मच्छीमारी जाळी चाेरीला गेल्याची घटना ऑक्टोबर, २०२०मध्ये घडली हाेती. या प्रकरणी दोघा जणांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात तब्बल पाच महिन्यांनी तक्रार दिली असून, पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर, २०२० रोजी शौकतअली मुकादम (६०, रा. मिरकरवाडा पांजरी मोहल्ला) यांची मिनी पर्सनेटची जाळी मासेमारी करताना फाटली होती. त्यांनी समुद्रातून परत येऊन मिरकरवाडा जेटीवर वरीस सालिम मुल्ला यांच्या लॉचवर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सुमारे ४ लाख रुपये किमतीची १५० ग्रॅम वजनाची शिसे असलेली जुनी जाळी ठेवली होती. मात्र, ही जाळी चाेरली गेल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे. या चाेरीप्रकरणी त्यांनी दाेघांवर संशय व्यक्त केला असून, त्यांच्या विराेधात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी शहर पाेलीस स्थानकात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करत आहेत.