अलिबाग : राज्य आणि केंद्र सरकारकडे भरपूर पैसा आहे. विकास शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे. मुंबई-अलिबाग ‘फास्ट मोटर ट्रान्सपोर्ट’ सुविधा देण्यात येत आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत. पण त्याच वेळी कोणीही कितीही गुन्हे लपवण्याचा प्रयत्न केला तरी सरकार त्यांना पाठीशी घालणार नाही, असा जाहीर इशारा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवारी येथे बोलताना दिला.अलिबाग नगरपरिषदेतील गेल्या ३० वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडून अलिबाग न.पा.ची सत्ता ताब्यात घेण्याकरिता भाजपा, काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि मनसे अशा चार पक्षांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या अलिबाग शहर संघर्ष समितीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर मधुकर ठाकूर व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री मेहता बोलत होते.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, काँग्रेस नेते माजी आमदार मधुकर ठाकूर, अलिबाग शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड.सागर पाटील, भाजपाचे अॅड.महेश मोहिते, समितीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर मधुकर ठाकूर व सर्व नगरसेवकपदाचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.पालकमंत्री मेहता म्हणाले की, इतिहास आणि शौर्याची परंपरा असलेल्या अलिबाग शहरात आठवड्याला दोन लाख पर्यटक येतात परंतु त्यांना साधी सुविधा नाही. जिल्ह्याच्या राजधानीचे हे शहर पण गेल्या ३० वर्षांपासून सत्ता असलेल्या शेकापकडे जनतेप्रति कटिबद्धता नसल्याने येथे विकास झाला नाही. विकासाच्या मुद्द्यावर अलिबागच्या नागरिकांनी दिलेल्या संकेतानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सर्व उमेदवारांना येत्या २७ नोव्हेंबर रोजी मतदान करुन अलिबागकर नागरिक निवडून देतील याची खात्री आहे. मी कुठेही असलो तरी सतत अलिबाग शहर संघर्ष समितीबरोबरच असेन आणि अलिबाग शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन, असे मेहता यांनी सांगितले.यंदाच्या निवडणुकीत शेकापमुक्त अलिबाग ही घोषणा असल्याचे यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले तर निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)
विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो
By admin | Updated: November 16, 2016 04:39 IST