लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : नगरपरिषद हद्दीत बाजारपेठ तसेच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत लागणाऱ्या हातगाड्या, रिक्षा, दुकानासमोर लागणारी दुकानदारांच्या वस्तू, अनधिकृत लागणारी रस्त्यावरील वाहने, दुकानासमोर माल खाली करणारे ट्रक व गाड्या अशा अनेक कारणांमुळे कर्जत शहरात वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी कर्जत पोलीस ठाणे व नगरपरिषद संयुक्त कारवाई करणार त्यामुळे वाहन चालक, अनधिकृत हातगाड्या, पथारीवाल्यांनो सावध राहा, ही कारवाई शुक्रवारपासून होणार असल्याचे बैठकीत ठरले आहे.शहरातील वाहतूक प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी कर्जत नगरपरिषद आणि पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषदेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांनी प्रास्ताविकात वाहतुकीच्या नियमांचे सर्वसामान्य जनतेने पालन केले तर वाहतुकीची समस्या भेडसावणार नाही असे सांगितले. पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी मी कर्जत पोलीस ठाण्यात नव्याने आले आहे, एक महिन्याच्या कालावधीत एक गोष्ट निदर्शनास आली. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतुकीच्या नियमाचे पालन होत नाही त्यामुळे कोंडीचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे. बाजारपेठेत दुकानदार सामान बाहेर ठेवत आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पथारीवाले बसत आहेत, हातगाड्या रस्त्याच्या मधोमध उभ्या असतात, मुख्यबाजारपेठेत काही गाड्या कायमस्वरूपी उभ्या आहेत, मोटारसायकल कशाही उभ्या केल्या जात आहेत यामुळेच कर्जत शहरात वाहतुकीची समस्या जाणवत आहे. यावर उपाययोजना म्हणून कर्जत नगरपरिषद धडक कारवाई करणार आहे आणि त्यांना या कारवाईसाठी जे पोलिसांचे सहकार्य लागेल ते देण्यात येईल असे सांगून शहरातील काही रस्ते एकमार्ग करण्यात येणार आहे. तसेच कर्जतमध्ये शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात गाड्यांना प्रवेश नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, उपनगराध्यक्षा अर्चना बैलमारे, विरोधी पक्षनेत्या यमू विचारे, नगरसेविका सुवर्णा जोशी आदींसह प्रशांत उगले, नंदू पोथरकर रिक्षाचालक, नागरिक उपस्थित होते.
अनधिकृत हातगाड्या, पथारीवाल्यांनो सावधान!
By admin | Updated: May 12, 2017 01:54 IST