- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सद्यस्थितीतील पाऊस शेतीकरिता समाधानकारक असला तरी गेल्या महिन्याभराच्या पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यातील २३५ घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे आणि तशी भरपाईदेखील देण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी अद्याप भरपाई न मिळाल्याने ज्यांच्या घरांची पडझड झाली आहेत, ते नागरिक अडचणीत आले आहेत, तर काही ठिकाणी गुरांचे नऊ गोठे पडल्याने आठ जनावरांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.२३५ यापैकी ११ पक्की घरे कोसळली आहेत, मात्र शासकीय आर्थिक मदत त्यांना उपलब्ध झालेली नाही. ३२ पक्क्या घरांची अंशत: पडझड झाली. त्यापैकी १४ घरमालकांना ३६ हजार ४०० रुपये सरकारी अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. १९२ कच्च्या घराची मोठी पडझड झाली. त्यापैकी १६४ घरमालकांना २ लाख ४४ हजार ७३६ रुपयांचे सरकारी आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे. गुरांचे ९ गोठे पूर्णपणे कोसळले आहेत, मात्र त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारचे आर्थिक साहाय्य प्राप्त झालेले नाही. जिल्ह्यात १३ सार्वजनिक मालमत्तांचे पावसामुळे २ लाख ५७ हजार रुपयांचे तर ८ खासगी मालमत्तांचे १ लाख ५८ हजार असे एकूण ४ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.धुवाधार पावसामुळे जिल्ह्यात दोन बळी गेले असून मृतांच्या कुटुंबीयांनादेखील अद्याप नुकसानभरपाई मिळेलेली नाही. मोठी दुधाळ जनावरे ३, ओढकाम करणारी मोठी जनावरे ३ आणि ओढकाम करणारी लहान जनावरे २ अशी एकूण ८ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. मात्र, त्यांच्या मालक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळू शकलेली नाही. सरकारी नुकसानभरपाईचे पंचनामे सध्या सुरू असून ते प्राप्त होताच उर्वरित नुकसानभरपाई देण्याचे नियोजन असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात भात लावण्या अखेरच्या टप्प्यातपावसाच्या पुनरागमनामुळे भात लावण्यांनी जिल्ह्यात चांगलाच वेग घेतल्याने जिल्ह्यातील भात लावण्या अखेरच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. १ लाख २३ हजार ७३० हेक्टर क्षेत्रावर भात लावणीचे नियोजन आहे. त्यापैकी गुरुवारअखेर ८६ हजार २५८ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ७० ते ७५ टक्के भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत. भात लावणीमध्ये रोहा तालुक्याने चांगलीच आघाडी घेतली असून येथे ९० टक्के लावण्या पूर्ण झाल्या आहेत. मुरु ड, महाड, पोलादपूर आणि म्हसळा या चार तालुक्यांत ८५ टक्के भात लावणी पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण १ लाख ४१ हजार ४८३ हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे १ लाख २३ हजार ७३० हेक्टर भाताखालील आहे. उर्वरित क्षेत्रात नागली, वरी, अन्य तृणधान्य व कडधान्य पिकांच्या लागवडीचे नियोजन आहे. या पिकांच्या पेरण्यांनादेखील वेग आला आहे. रोहा येथे सर्वाधिक १३८ मि. मी. पावसाची नोंदगुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १३८ मि.मी. पावसाची नोंद रोहा येथे झाली आहे. याच २४ तासांत जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ७३.०६ होते. अलिबाग येथे ७४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून पेण ११० मि.मी., मुरु ड ९७ मि.मी., पनवेल २२ मि.मी., उरण ३३ मि.मी., कर्जत ३४.८० मि.मी., खालापूर ६७ मि.मी., माणगाव ९४ मि.मी., सुधागड ८८.३३ मि.मी., तळा ९५ मि.मी., महाड ८० मि.मी., पोलादपूर ५८, म्हसळा ८०.८० मि.मी., श्रीवर्धन ५० मि.मी., माथेरान ४७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात २३५ घरांना पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:28 IST