ठाणे : महादेव देवळेच्या रूपाने एका बस कंडक्टरला मुंबईचा महापौर करणारी आणि वामनराव महाडीकांच्या रूपाने एका शिक्षकाला शिवसेनेचा पहिला आमदार करणारी बाळासाहेबांची शिवसेना संपली. यामुळे ठाण्याचा भगवा बालेकिल्ला या निवडणुकीच्या निकालात खंडहर झाल्याचे पहायला मिळाले तर आश्चर्य वाटाला नको अशा जहाल शब्दात जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी ठाणे आणि नवी मुंबईमधील शिवसेनेच्या उमेदवारांकडे पाहून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाण्यातील चार आणि नवी मुंबईतील दोन अशा सहा मतदारसंघापैकी जिल्हापती एकनाथ शिंदे वगळता अन्य पाचही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार इम्पोर्टेड आहेत. ठाणे शहरमध्ये कॉग्रेसमधून अगदी अलीकडे आलेले रवींद्र फाटक, ओवळा माजीवड्यात राष्ट्रवादीतून आलेले प्रताप सरनाईक, कळवा-मुंब्य्रात सगळे पक्ष फिरून शिवसेनेने आलेले दशरथ पाटील तर ऐरोलीमध्ये खासदारकीत गेल्या वेळी पडलेले व राष्ट्रवादीतून आलेले विजय चौगुले आणि बेलापूरमध्ये सनदी सेवेतून निवृत्त होऊन अगदी अलीकडे सेनेत दाखल झालेले विजय नाहटा असे उमेदवार आहेत. या पाच मतदारसंघात एका पेक्षा एक निष्ठावंत शिवसैनिक उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांच्याकडे धनसत्ता नसली तरी ते केवळ शिवसैनिकांच्या बळावर निवडून येऊ शकले असते. परंतु, त्यांना संधी देण्याऐवजी मातोश्रीने आयाराम गयारामांना उमेदवारी दिली आहे व त्या द्वारे सामान्य शिवसैनिकांना सत्तेची पदे देणारी शिवसेना संपुष्टात आणली आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेत जहालपणे उमटत आहे. विशेष म्हणजे या सगळ््यांना विद्यमान जिल्हापतींनी शिवसेनेत प्रयत्नपूर्वक आणलेले आहे. शिवसेनेमध्ये दबक्या स्वरात ही शिवसेना, मातोश्रीसेना की एकनाथ सेना अशी चर्चा सुरू आहे. माझा शिवसैनिक एखाद्या मतदारसंघात पडला तरी चालेल पण उमेदवारी त्यालाच. असा बाणा राबवून साहेबांनी संघटना वाढवली. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत संघटनेचे अथवा पैशांचे पाठबळ नसतांना शिवसैनिकांच्या मेहनतीच्या जोरावर शिवसेनेचे ५२ आमदार निवडून आले होते. १९९५ च्या निवडणुकीतही हा चमत्कार झाला होता. बाहेरच्यांना सोडा गद्दारीकरून सेनेतून बाहेर गेलेल्यांना सेनेत स्थान नव्हते त्यामुळे मातोश्रीने दिलेला प्रत्येक उमेदवार शिवसैनिकांना आपला वाटायचा. परंतु, आता स्थिती तशी राहिलेली नाही हेच या उमेदवारांवरून सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया सेनेत उमटते आहे.
शिवसेनेत आता इम्पोर्टेंडचे राज
By admin | Updated: September 29, 2014 02:52 IST