अलिबाग : आदर्श शिक्षक, आदर्श अधिपरिचारिका यांना पुरस्कार देताना जिल्हा परिषद सदस्यांची शिफारस घेतली जाते, मात्र आदर्श ग्रामसेवकांना पुरस्कार देताना ती का घेतली नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद शामकांत भोकरे यांनी केला. २९ फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याचे कारण देण्याच्या सूचना भोकरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.निष्क्रिय ग्रामसेवकांना पुरस्कार देण्यात आल्याचा आरोप भोकरे यांनी केल्याने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्याचे दिसून येते. भोकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेमध्ये पक्ष प्रतोद आहेत, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे हेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत, असे असताना भोकरे यांनी या पुरस्कारांवर आक्षेप घेतल्याने जिल्हा परिषदेच्या नेतृत्वालाच आव्हान दिल्याचे त्या निमित्ताने समोर आले आहे. जिल्ह्यातील ७५ ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अलिबाग-कुरुळ येथील माळी समाज सभागृहात पुरस्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे होते. गेल्या पाच वर्षात ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. मागील पाच वर्षाचा अनुशेष भरुन काढीत जिल्हा परिषदेने तब्बल ७५ ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोचविण्याचे काम जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी करावे, असे आवाहन शेकापचे आमदार सुभाष पाटील यांनी केले. ग्रामीण भागात काम करणाऱ्या ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकार विकास योजनांसाठी निधी देत नाही. केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे व्यापार धार्जिणे आहे. (प्रतिनिधी)आमदार सुभाष पाटील यांनी केली टीकाकेंद्र सरकार विकास योजनांसाठी निधी देत नाही. केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे व्यापार धार्जिणे आहे. मेक इन इंडियाच्या नावाने सरकार देशातील जनतेची फसवणूक करीत असल्याची घणाघाती टीका आमदार पाटील यांनी केली. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, शिक्षण सभापती भाई पाशिलकर, अर्थ सभापती चित्रा पाटील, समाज कल्याण सभापती गीता जाधव, महिला, बालकल्याण सभापती प्रिया मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते.
आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वादात
By admin | Updated: February 22, 2016 00:43 IST