कर्जत : तालुक्यातील किकवी येथे वराह पालन व्यवसाय करणारा फार्म हाऊस बेकायदा पद्धतीने गेली चार वर्षे सुरू आहे. त्या मोकाट डुकरांमुळे परिसरातील सहा गावांतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डुकरांचे मलमूत्र आणि विष्ठा ही नाल्यातून चिल्लार नदीमध्ये येत आहे. त्या दुर्गंधीमुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. तो बेकायदा डुक्कर फार्म येथून अन्य ठिकाणी हलवावा आणि येथील व्यवसाय बंद करण्याचा ठराव पाथरज ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने घेतला आहे. पाथरज ग्रामपंचायत हद्दीमधील किकवी गावाच्या परिसरातील ६० एकर जागेमध्ये लुईस फार्म हाऊस आहे. तेथे गेल्या चार वर्षांपासून डुक्कर पालन करण्याचा व्यवसाय सुरू आहे. एकावेळी किमान दोन हजार डुकरांची पिल्ले तेथे आणली जातात. त्यांचे संगोपन करताना ८०-१०० वजनाचे झाल्यानंतर डुक्कर कत्तल करण्यासाठी येथून नेले जातात. मात्र या कालावधीत त्या डुकरांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. दिवसभर हे सर्व डुक्कर तेथील विस्तीर्ण जागेत फिरत असतात. येथील या दोन हजार डुकरांसाठी मुंबईच्या विविध हॉटेलमधून उष्टे आणि शिल्लक राहिलेले अन्न प्लास्टिक बॅगामधून किकवी येथे आणले जाते. त्या ४-५ टन एवढ्या मोठ्या संख्येने आणल्या जाणाऱ्या उष्ट्या अन्नामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण होते. ते अन्न अस्ताव्यस्त पद्धतीने फार्महाऊसमध्ये भिरकावले जात असल्याने दुर्गंधी निर्माण होते. मुंबईमधून आणलेले अन्न ज्या प्लास्टिक पिशव्यांमधून किकवी येथे आणले जाते, त्या सर्व पिशव्या जमिनीमध्ये न गाडता किकवी गावाच्या रस्त्यालगत फेकून देण्यात येत आहेत. या सर्व दुर्गंधी पसरवणाऱ्या गोष्टींमुळे परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खरबाचीवाडी, किकवी, शिलार, शिलारवाडी, बोरवाडी आणि आणखी काही वाड्यांमधील लोकांना घराबाहेर मोकळा श्वास घेणे कठीण झाले आहे. घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून बसायची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. त्यात आणखी भर म्हणजे लुईस फार्म हाऊसमधील डुकरांची विष्ठा आणि मलमूत्र हे तेथील नाल्यातून चिल्लार नदीमध्ये सोडले जात आहे. चिल्लार नदी पुढे बारमाही वाहत्या उल्हास नदीला जाऊन मिळते. या विष्ठेमुळे चिल्लार नदी देखील दूषित होत आहे. या नदीच्या तीरावर अनेक नळपाणी योजना असून पुढील काळात त्यांचे पाणी दूषित होऊन त्या पाणी योजनांचे पाणी पिणाऱ्या लोकांचे देखील आरोग्य धोक्यात येणार आहे. डुक्कर फार्म तेथून हलवावा आणि संपूर्ण व्यवहार, व्यवसाय बंद करण्यात यावा, अशी मागणी पाथरज ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष मोहन शिंगटे यांनी ग्रामसभेत केली. ग्रामसभेने एकमताने हा ठराव मंजूर केला असून डुक्कर फार्म हाऊस बंद न केल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. (वार्ताहर)
डुक्कर फार्ममुळे आरोग्य धोक्यात
By admin | Updated: August 24, 2015 02:35 IST