अलिबाग : राज्यातील समुद्रकिनारे स्वच्छ व सुरक्षित राहावेत या उद्देशाने निर्मल सागरतट अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्थानिकांच्या सहभागातून ग्रामस्तरीय सागरतट व्यवस्थापन समित्या स्थापन केल्याआहेत. याच योजनेंतर्गत रायगडमधील ११ किनारी गावांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी १० किनारी गावांतील ग्रामस्तरीय सागरतट व्यवस्थापन समिती प्रमुखांना शुक्रवारी पहिल्या टप्प्यात एकूण अनुदानाच्या ४० टक्के अनुदानाचे धनादेश अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले.राज्यातील ७३ ग्रामस्तरीय सागरतट व्यवस्थापन समित्यांना गाव विकास आराखडा तयार करण्यासाठी निधीचे वाटप करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील काशिद आणि नागाव (अलिबाग) या दोन गावांच्या समित्यांना प्रत्येकी २० लाख रुपये देण्यात येणार असून, त्यापैकी ८ लाखांचा धनादेश देण्यात आला. दिवेआगर गाव समितीस १५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून ६ लाखांचा धनादेश देण्यात आला. तर उर्वरित आवास, मिळकतखार, किहिम, आक्षी, रेवदंडा, हरिहरेश्वर, नागाव (उरण) या १० गावांना निधीचे वाटप करण्यात येत आहे. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे उपसंचालक व समन्वयक राय सिंघानिया, सागरी अभियंता प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
निर्मल सागरतट अभियानांतर्गत निधिवाटप
By admin | Updated: December 31, 2016 02:41 IST