ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ : गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. मात्र चालू वर्षात बळीराजाच्या मदतीला पाऊस धाऊन येणार असल्याचा सुधारीत अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने वर्तवला आहे. दुष्काळ, गारपीट आणि अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं स्कायमेटचा अंदाजानं शेतक-यांना नक्कीच आशेची पालवी फुटणार आहे. स्कायमेटच्या सुधारीत अंदाजात यंदा सरासरी १०९ टक्के पाऊस पडणार असल्याचं जाहीर केलं आहे.
यापुर्वी, स्कायमेटच्या अंदाजानुसार, सरासरी १०५ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तला होता. जून महिन्यात सरासरीच्या ९० टक्के, जुलै महिन्यात १०५ टक्के, ऑगस्ट महिन्यात १०८ टक्के, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या ११५ टक्के पाऊस पडणार आहे. एकूण सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं होतं.
जूनमध्ये १६४ मिमी पाऊस, जुलैमध्ये २८९ मिमी, ऑगस्टमध्ये २६१ मिमी, तर सप्टेंबर महिन्यात १७३ मिमी पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. बळीराजाच्या दृष्टीने चांगल्या पावसाचं भाकित स्कायमेटने वर्तवलं आहे.
स्कायमेटनंतर १२ एप्रिल रोजी भारतीय हवामान विभागाने १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचे भाकित वर्तवले होते.
दुष्काळ, गारपीट आणि अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना या अंदाजाने शेतक-यांना नक्कीच आशेची पालवी फुटणार आहे. सलग दोनतीन वर्ष दुष्काळ सोसणाऱ्या जनतेला हा मोठा दिलासा आहे. विदर्भ, मराठवाड्यालाही गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे.