येरवडा : छत्रपती घराण्याचे वारस म्हणून शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेनुसार समाजातील सर्व जाती घटकांच्या उन्नती व प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहू. त्याकरिता शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी दिली.
महापालिकेच्या वतीने धानोरी प्रभाग क्रमांक एक येथे नगरसेवक अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे यांच्या वतीने आयोजित जलतरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट व बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटनप्रसंगी छत्रपती संभाजीराजे बोलत होते.
खासदार गिरीश बापट, आमदार सुनील टिंगरे, भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक, बापूसाहेब पठारे, नगरसेविका ऐश्वर्या जाधव, नगरसेवक मारुती सांगडे, ॲड. नानासाहेब नलावडे, राजेंद्र खांदवे, संतोष खादवे, मोहनराव शिंदे, नितीन भुजबळ, धनंजय जाधव उपस्थित होते.
वडगावशेरी मतदार संघातील सत्ताधारी व विरोधक आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर आले होते. संयोजक नगरसेवक अनिल टिंगरे यांनी प्रकल्पांची माहिती दिली.
भामा आसखेड प्रकल्पासाठी सर्वांनीच प्रयत्न केले आहेत. ते पाणी पिणाऱ्या व्यक्तीला जो आनंद मिळतो तो सर्वात महत्त्वाचा आहे. शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या हितासाठी राजकारण करू नये, असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
माजी आमदार बापू पठारे यांनी भामा-आसखेड प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. जो काम करतो त्याला त्याच श्रेय मिळायला हवे, लोहगाव-कळस धानोरी येरवडा या भागाला सर्वप्रथम योजनेचा लाभ मिळणार आहे. खराडीला योजनेचे पाणी मिळणार नाही. प्रकल्प जरी माझ्या काळात सुरू केला असला तरी त्याचा फायदा सर्व नागरिकांना होणार यात आनंद आहे.
राजकारणात संधी सर्वांनाच मिळते,जनता सुज्ञ आहे ती योग्य व्यक्तीला संधी देते. राजकीय मतभेद बाजूला ठेवत प्रभागात व मतदारसंघात काम करत असल्याचे आमदार सुनील टिंगरे यांनी या वेळी सांगितले.
छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेतील स्वराज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराच्या विकासासाठी नागरिकांच्या हितासाठी काम सुरू आहे. पक्षाचे नगरसेवक त्यासाठी प्रामाणिकपणे काम करत असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.
फोटो ओळ : धानोरी प्रभागातील विविध बहुउद्देशीय विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना खासदार छत्रपती संभाजीराजे, गिरीश बापट, सुनील टिंगरे, अनिल टिंगरे व इतर मान्यवर.