पुणे : आम्ही पक्षाची ध्येयधोरणे शहरातील प्रत्येक महिलेपर्य़ंत पोहोचवू. पक्षाचे सगळे गतवैभव परत आणू असा निर्धार पश्चिम महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
काँग्रेस भवनात सोमवारी दिवसभर ही बैठक झाली. काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांंनी यावेळी बैठकीत महिलांना मार्गदर्शन केले. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस अॅड. अभय छाजेड आमदार संग्राम थोपटे, दीप्ती चौधरी, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, वीरेंद्र किराड, नगरसेविका पूजा आनंद, संगीता धोंडे, सोनाली मारणे, श्यामला सोनावणे, सीमा सावंत, गिरिजा कुदळे आदी यावेळी उपस्थित होते.
सव्वालाखे म्हणाल्या, “उमेदवारी हवी असेल तर आधी निवडून येण्याची क्षमता निर्माण करावी लागते. ती क्षमता कामातूनच तयार होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त महिलांना संधी मिळावी यासाठी महिला काँग्रेस कटिबद्ध आहे. त्यासाठी पक्षाचे काम वाढवणे गरजेचे आहे.”