पवनानगर : पवना धरणात आजअखेर अवघा १८.८५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ४० वर्षांत प्रथमच १६ जूनअखेर पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजना व पिंपरी-चिंचवड परिसरावर पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे. पाणीसाठा घटल्याने पाटबंधारे विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांची सोमवारी तातडीची बैठक होणार आहे. धरण परिसरात १४ जूनला २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १६ जूनला १५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर एकूण २६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ३८८ मिमी पावसाची नोंद झाली होती. आताचा पवना धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ४८ टक्के आहे. धरणाचे काम १९७२ मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून पाणी पातळीत २०१२ चा अपवाद वगळता जून महिन्यात कमी झाला नव्हता. २०१२ मध्ये जुलैअखेर धरणात कमी साठा शिल्लक होता. मात्र, एक महिना अगोदर १८.८५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी २०१३ मध्ये जून महिन्यात प्रथमच ११ फुटांनी पवना धरणाची पाणी पातळी वाढली होती. ती या वर्षी खूपच कमी झाली आहे. धरणातून दररोज १२०० क्युसेक्सने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. सध्या १.६० टीएमसी पाणी शिल्लक राहिल्याने तसेच पाणी पातळी कमी झाल्याने बाराशेऐवजी हजार क्युसेक्सने पाणी सोडावे लागणार असल्याचे पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर आणखी दीड महिने पिण्याचे पाणी पुरेल असा महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
शहरामध्ये पाणीकपात?
By admin | Updated: June 23, 2014 01:16 IST