उरुळी कांचन : पुणे शहरापासून जवळ असणार्या उरुळी कांचन शहरासाठी ग्रामपंचायतीने राज्य शासनाला ५४ कोटींची पाणी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत १३ महिन्यांपूर्वी प्रस्तावित केली आहे. मात्र, या फायली मंत्रालयात पडून आहेत. उरुळी कांचन शहराच्या २०११ च्या जनगणनेनुसार, ३० हजार लोकसंख्या आहे. तसेच, दररोज उरुळी कांचन शहरात येणार्या-जाणार्या प्रवाशी व नागरिकांची ३५ हजार संख्या असून, खडकवासल्याहून येणार्या कॅनॉलवर पाणी योजना अवलंबून आहे. कॅनॉलला पाणी असेल, तरच उरुळी कांचन शहराला दररोज पाणीपुरवठा होतो. कॅनॉलचे पाणी बंद झाल्यास नाना कांचन यांच्या खासगी विहिरीतून, विलास कारभारी कांचन, तसेच महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या विहिरीतून पाणी घेण्यात येते. पाणीटंचाईच्या काळात गायकवाड वडेवाले हे त्यांच्या विंधन विहिरीचे पाणी कोणताही मोबदला न घेता गावासाठी सहकार्य करत आहेत. भविष्यातील झपाट्याने वाढणार्या लोकसंख्येचा विचार करता ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे ५४ कोटी रुपयांची पाणीयोजना प्रस्तावित केली. यासाठी राममंदिर ट्रस्टने ५ एकर जागा ग्रामपंचायतीसाठी दिली आहे. गावातील पाणी योजनेचा सॅटेलाईट सर्व्हे करण्यात आला असून, अस्तित्वात असणार्या पाण्याच्या टाक्या, आवश्यक लागणार्या टाक्या, फिल्टर प्लँट, पाईप लाईन या बाबींचा सर्व्हे झाला आहे. मात्र, फाईल सध्या पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल यांच्या विभागाकडे पडून आहे. ही योजना लवकरात लवकर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)
उरुळी कांचनची पाणी योजना मंत्रालयात अडकली
By admin | Updated: May 23, 2014 05:05 IST