किवळे : वाल्हेकरवाडी येथील चिंचवडे कॉलनी भागातील महावितरण कंपनीच्या वाहिन्यांमुळे परिसरात अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका असल्याने सर्व विद्युतवाहिन्या भूमिगत करण्याच्या प्रमुख मागणीसाठी चिंतामणी चौकात बुधवारी सकाळपासून उपोषण सुरू केले होते. महावितरणचे पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता इ. अ. मुलाणी यांनी सदर काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे पत्र दिल्याने उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण दुपारी चारच्या सुमारास सोडले. वाल्हेकरवाडीतील चिंचवडे कॉलनी क्रमांक एक , दोन व तीन या भागात महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिन्या अनेक घरांवर तसेच विविध रस्त्यालगत लोंबकळत असल्याने अनेकदा अपघात झाले आहेत. यासंदर्भात महावितरण अधिकार्यांना वारंवार निवेदन देऊन सर्व वाहिन्या भूमिगत करण्याबाबत निदर्शनास आणले होते. मात्र कंपनीकडून चालढकल होत असल्याने बुधवारी सकाळपासून वाल्हेकरवाडीतील चिंतामणी मंदिरानजीकच्या चौकात नगरसेविका संगिता भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरु केले. उपोषणाची दखल घेऊन सकाळी अकराच्या सुमारास महावितरणच्या काही स्थानिक अधिकार्यांनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली होती. मात्र उपोषणकर्ते ठाम राहिल्याने दुपारी चारच्या सुमारास पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता मुलाणी यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. तसेच त्यांनी भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळालेली असून, महावितरणच्या मंजूर प्रकल्पातील लघुदाब वाहिनी भूमिगत करण्यासाठी प्राधान्याने आगामी तीन महिन्यात काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण सोडण्यात आले. या वेळी उपकार्यकारी अभियंता संजय पोळ, शाखा अभियंता पवार उपस्थित होते. उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते रामदास केंदळे, तसेच महिला व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने बसले होते. दिवसभरात शिवसेना उपजिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर, भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, एच. बी. ननावरे, पाटीलबुवा चिंचवडे, खंडू चिंचवडे, शिरीष कर्णिक आदींनी भेटून उपोषणाला पाठिंबा दिला. (वार्ताहर)
लोंबकळणार्या विद्युत वाहिन्या भूमिगत कराव्यात
By admin | Updated: May 22, 2014 06:12 IST