पिंपळवंडी : पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथील टोलनाक्यावर शनिवारी (दि. ११) मध्यरात्री बारा वाजल्यापासून पथकर आकारणी सुरू करण्यात येणार होती, संतप्त ग्रामस्थांनी टोलनाक्यावरील वसुलीचे काम बंद पाडले.राजगुरुनगर ते सिन्नर यादरम्यान चौपदरी रस्त्यावर काम करण्यात आले असून या महामार्गावर जुन्नर तालुक्यात चाळकवाडी आणि संगमनेर तालुक्यात हिवरगाव पावसाळ्यात या ठिकाणी टोलनाके उभारण्यात आले आहेत. भारतीय राजमार्ग प्राधिकरणाच्या करारपत्रकानुसार दि. ३१ जानेवारी रोजी १०४.६३६ किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण झाला असल्याबाबतचे पत्र संबंधित यंत्रणेकडून मिळाले असल्यामुळे व्यावसायिक वापरासाठी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने पथकर वसुली करण्यास मान्यता दिली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी व घरे गेली आहेत, त्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. त्यामुळे टोलवसुली न करण्याची ग्रामस्थांची मागणी होती. (वार्ताहर)
ग्रामस्थांनी बंद पाडला महामार्गावरील टोल
By admin | Updated: February 13, 2017 02:30 IST