पुणे : नालायक राजकारणी आणि भ्रष्ट विद्वानांपासून संविधानाला धोका आहे. समतेच्या प्रकाशात न्हाऊन निघणारे गाव कवीला हवे आहे. डॉ. सुभाष वाघमारे हे विचारवंत कवी असून, ते सत्तेपेक्षा सत्याचे कैवारी आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले आहे.
डॉ. सुभाष वाघमारे यांनी लिहिलेल्या ‘संविधानाच्या स्वप्नातील गाव’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात डॉ. सबनीस बोलत होते. साहित्यविश्व प्रकाशन आणि रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील मराठी विभाग यांनी या समारंभाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी रयतचे सचिव, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर होते. श्रीरामपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रकाशक कवी विक्रम शिंदे उपस्थित होते.
"संविधानाचा ध्यास घेणारी २१ व्या शतकातील मराठी साहित्यातील डॉ. वाघमारे यांची दुर्मिळातील दुर्मिळ कविता आहे. भारतीय संविधान आणि ग्रामीण भारताचा अनुबंध गावाच्या माध्यमातून मराठी साहित्यात कवितेतून प्रथमच जुळवण्याचे राष्ट्रीय कर्तव्य डॉ. वाघमारे यांनी केलेले आहे. हा कवितासंग्रह संविधानाचा धर्म सांगत असून त्यात विश्वधर्माची, माणुसकीची पायाभरणी करणारी ही कविता आहे. विवेकी विद्रोह व सेक्युलर संस्कार करणारी ही कविता आहे. हरामखोर सत्तेला उध्वस्त करणे हा या कवितेचा उद्देश असून वेदनामुक्त मानवतेशी बांधलेली ही कविता सांगते आहे. मानवी विधायक संस्कृतीचा सारांश पचवलेली ही कविता आहे. विकृती भोगून संस्कृतीला जन्म देणारा हा कवी आहे. सर्व समाज सुधारक व संत यांच्यातील माणुसकीची बेरीज ही कविता करते", असेही डॉ. सबनीस यांनी सांगितले.
डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, 'डॉ.वाघमारे हे ज्ञानप्रेमी, पुरोगामी मूल्यांसाठी संघर्ष करणारे असून माणुसकी, अभ्यासाची जाणीव व सर्वांशी संवाद साधणे हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे'. गावशिवारातले हंबरडे त्यांनी अनुभवले आहेत. त्यांची कविता जगत कल्याणाचा ध्यास घेतलेली असून आत्मभान,आत्मबळ,व आत्मप्रेरणा देणारी कविता आहे.'
डॉ.अनिलकुमार वावरे यांनी प्रास्ताविक केले. कवी डॉ. सुभाष वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. विक्रम शिंदे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. गजानन चव्हाण यांनी केले.