पुणे : बहुचर्चित असलेल्या २४ तास पाणी योजनेच्या मागील ग्रहण काही सुटण्यास तयार नाही. टाक्यांच्या निविदा प्रकरणातील चौकशी अहवालात आता नगर विकास मंत्रालयाने त्रुटी काढल्या असून त्याचे निराकारण करण्याबाबतचे पत्र मंत्रालयाने महापालिकेला पाठवले आहे. आता त्याचे उत्तर जात नाही तोपर्यंत या योजनेतील टाक्यांच्या कामाला सरकारने दिलेली स्थगिती कायमच राहणार आहे. आयुक्त कुणाल कुमार रजेवर असल्याने त्रुटींचे निराकरण त्यांनी करायचे, की पाणीपुरवठा विभागाने केले तरी चालेल, हाही प्रश्न अनुत्तरीत आहे. २४ तास पाणी योजनेतंर्गत महापालिका प्रशासन शहरात विविध ठिकाणी ८२ पाणी साठवण टाक्या बांधणार आहे. एकूण २३५ कोटी रुपयांच्या या कामाची निविदा प्रसिद्ध करताना त्यात गैरप्रकार झाल, असा आरोप करत आयुक्त कुणाल कुमार यांच्या कामकाजावर शंका घेत आमदार अनंत गाडगीळ व अनिल भोसले यांनी विधान परिषद अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले होते.त्याची दखल घेत नगर विकास मंत्रालयाने टाक्यांच्या कामाला स्थगिती दिली. त्यामुळे आॅगस्ट २०१६ मध्ये कार्यारंभ आदेश मिळूनही संबधित कंपनीला टाक्यांचे काम अद्याप सुरू करता आलेले नाही. नगर विकास मंत्रालयाने कामाला स्थगिती देताना आयुक्तांनी या निविदा प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करावा, असा आदेश दिला. ज्यांच्या कामावर शंका घेतली जात आहे, त्यांच्यावर चौकशी अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिल्यावरूनही टीका करण्यात आली.आयुक्तांनी त्वरित हा अहवाल तयार करून पाठवला. १२ मार्चला पाठवलेल्या या अहवालावर नगर विकासने काहीच निर्णय घेतला नाही व आता २५ एप्रिलला महापालिकेला त्या अहवालात त्रुटी असल्याबाबतचे पत्र पाठवले आहे. त्यात त्रुटी म्हणून जे काही नमूद करण्यात आले त्याची उत्तरे अहवालात असूनही पुन्हा अशी विचारणा झाल्यामुळे प्रशासनही अचंबित झाले आहे. त्यातच आयुक्त कुणाल कुमार रजेवर आहेत. त्यामुळे आता या त्रुटींबाबत कसे उत्तर द्यायचे, या विचारात प्रशासन आहे. (प्रतिनिधी)
टाक्यांच्या कामाला स्थगितीच
By admin | Updated: April 28, 2017 06:01 IST