सोमेश्वरनगर : साखर कारखानदारीला दिलासा ठरलेली साखरेची दरवाढ अवघ्या दोन महिन्यांची ठरली. ३,००० ते ३,१०० रुपयांपर्यंत गेलेले साखरेचे दर पुन्हा २,८०० ते २,९०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. दोनशे रुपयांची ही दरातील घसरण कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडून टाकणारी ठरणार आहे, यामुळे शेतकर्यांना उसाचे दुसरे आणि तिसरे पेमेंट मिळेल का नाही, याची धास्ती वाटू लागली आहे. सन २०१३-१४मध्ये वर्षभर साखरेचे दर हे २,५०० रुपये क्विंटलच्या आसपास घुटमळत होते. त्यामुळे राज्यातील कारखान्यांपुढे आर्थिक संकट उभे राहीले होते. एक वर्ष साखरेचे दर ‘जैसे थे’ होते. त्यामुळे अनेक कारखाने शॉर्ट मार्जीन मध्ये गेले होते. गेल्या हंगामात राज्यातील अनेक कारखान्यांने शेतकर्यांना शासनाने ऊसाचे निर्धारीत मुल्य (एफआरपी) देण्यासाठी असमर्थता दशविली. साखरेचे दर पडलेले असताना शेतकर्यांना ऊसाचा पहीला हप्ता देण्यासाठी कारखान्यांकडे पैसेच नव्हते. शेवटी केंद्र शासनाने यामध्ये हस्तेक्षेप करत देशातील साखर कारखान्यांसाठी ६६०० कोटी रूपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले. त्यातील महाराष्ट्राच्या वाटयाला २२०० कोटी रूपये आले होते. मात्र कारखाने चालू झाल्यापासून १४ दिवसांच्या आत पहीला हप्ता देणे बंधनकारक असताना मात्र केंद्राकडून कारखान्यांना पैसे मिळता मिळता मार्च महीना उजाडला. पहीला हप्ता मिळण्यासाठी शेतकर्यांना मार्च महीना उजाडण्याची वाट पाहवी लागली होती. जरी केंद्राने हे कर्ज बिनव्याजी जरी दिले असले तरी कारखान्यांना ते फेडायचे आहे. त्यामुळे साखरेला चांगले दर राहणे आवश्यक आहे. एप्रिल महिन्यापासून कच्च्या साखरेचे निर्यात अनुदान ३३० रूपयांवरून २२७ रूपयांवर आणल्याने निर्यात थंडावली. या वर्षीही देशांतर्गत साखर निमिर्ती समाधानकारक झाली आहे. पुढील हंगाम हा अतिरीक्त साखरेचे ठरणार आहे. यामुळे भविष्यात साखरेच्या दराची खात्री कोणीही देऊ शकत नाही. (वार्ताहर)
साखरेचे दर घसरले!
By admin | Updated: May 28, 2014 00:24 IST