पुणे : पुण्यासाठी पुरेसा पाणीसाठा असून, उन्हाळ्याच्या ऐन मध्यातही पाणीकपात करण्याची गरज भासणार नाही. शेतीसाठी सध्या आवर्तन सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतरही पुण्याला रोज दोन वेळ व्यवस्थित पाणी देता येईल इतके पाणी धरणसाखळीत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कडक असला तरी पुणेकरांना त्यावर पाण्याचा दिलासा मिळणार आहे.खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणसाखळीत सध्या ८.५६ टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळात या चारही धरणांत मिळून फक्त ५.४२ टीएमसी पाणी होते. त्यामुळे पुणे शहराला सुमारे वर्षभर एक वेळ व नंतर दोन दिवसांनी एक वेळ असा पाणीपुरवठा केला जात होता. या वेळी मात्र धरणात पुरेसे पाणी आहे, त्यामुळे पुणे शहराच्या पाणीकपातीची गरज भासणार नाही असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.सध्या खडकवासला धरणातून शेतीच्या पाण्यासाठी म्हणून आवर्तन सुरू आहे. ते साधारण १० ते १२ मे पर्यंत सुरू राहील. त्यात साधारण ४ टीएमसी पाणी जाते. मात्र धरणसाखळीमुळे त्यानंतरही पुरेसा म्हणजे ४.५६ टीएमसी पाणीसाठा धरणात असेल. खडकवासला धरणातून पाणी कमी झाले की धरणसाखळीमुळे अन्य धरणांमधून त्यात पाणी जमा होते. खडकवासला धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. पुणे शहरासाठी याच धरणातून पाणी घेण्यात येते. त्यावर शुद्धीकरण करून ते पुणे शहराला पुरवले जाते.पुण्यासाठी धरणातून रोज १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. त्यातून दोन वेळा व्यवस्थित पाणी देता येते. सध्या तरी धरणात पुरेसे पाणी आहे. बाष्पीभवन होऊन पाणी कमी होण्याची शक्यता गृहीत धरली तरीही पुणे शहरात पाणी कपात करावी लागणार नाही असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. मागील पावसाळ्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. धरणसाखळीतील सर्व धरणे भरली होती. त्यामुळेच यंदा चारही धरणांत चांगले पाणी आहे. खडकवासला धरणातील पाणी कमी झाले तरी अन्य धरणांमधून त्यात पाणी येणार असल्यामुळे पुण्यावर पाणीटंचाईची वेळ येणार नाही. (प्रतिनिधी)
पुण्यासाठी पुरेसा पाणीसाठा
By admin | Updated: April 28, 2017 06:05 IST