देहूगाव : देहूला पाणी पुरवठा करणार्या बंधार्यातील शेताला पाणी उपसा करणार्या शेतकर्यांना तातडीने प्रतिबंध करून पाणी उपसा थांबवावा, असा आदेश प्रांताधिकारी स्नेहल बर्गे यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांना दिला. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीची आढावा बैठक प्रांताधिकार्यांच्या उपस्थितीत झाली. समस्यांवर चर्चा करण्यात आली. सध्या येथे जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. यात्राकाळात जीवन प्राधिकरणने योग्य ती काळजी घेऊन टीसीएल पावडर, क्लोरिनेशन व्यवस्था करावी. माळीनगर व देहूगावातील सुतारआळी भागात नवीन जलवाहिन्यांना टाकाव्यात. त्या तातडीने कार्यान्वित करून पाण्याची गळती थांबवावी, अशा सूचना अधिकार्यांना करण्यात आल्या आहेत. शासनाच्या वतीने पाण्याचे टॅँकर, फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत पराळे म्हणाले, गाथा मंदिर रस्ता येथे दुरूस्तीची कामे सुरू आहेत. गावातील भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम अद्यापही अपूर्ण आहे. वैकुंठगमन गोपाळपुरा मंदिराच्या भागात उघड्यावर विद्युत वाहिन्या आहेत. काही ठिकाणी त्या खाली आलेल्या आहेत. याची दुरूस्तीची कामे प्राधान्याने करावीत. गावातील उघड्यावर असलेल्या डीपी हलवावी अथवा त्याच्याभोवती संरक्षक कठडे उभे करून धोकादायक असल्याची सूचना लावावी व यात्रा काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी, असे बर्गे यांनी सांगितले. पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीला पाणी सोडण्यात येणार असून, त्यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती पाटनिरीक्षक एकनाथ नलावडे यांनी दिली. आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या काळात वहातूक पोलीस जास्त मागविण्यात येणार असून, चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असला, तरी पालखी प्रस्थानच्या वेळी व पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ होत असताना रस्त्यावर व अनगडशहा अली दर्ग्याजवळ गर्दी अथवा चेंगराचेंगरी होणार नाही यासाठी योग्य उपाय योजना करण्याच्या सूचना बर्गे यांनी केल्या. ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून अनुचित प्रकार टाळण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नेहमीप्रमाणे पालखी समवेत येणारी वाहने तळवडेमार्गे वळविण्यात येतील. (वार्ताहर)
पाणीउपसा थांबवा!
By admin | Updated: May 22, 2014 06:07 IST