पुणे : एका गावात एकापेक्षा जास्त कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची उभारणी करणे आता, शक्य होणार आहे. राज्य सरकारने आपल्या नियमात तसा बदल केला असून, त्याचे शुद्धीपत्रकदेखील काढले आहे. नवीन कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेची उभारणी करायची असल्यास त्या गावात पूर्वी अशी संस्था अस्तित्वात नसणे आवश्यक होते. त्यामुळे एकापेक्षा अधिक संस्था उभारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने राज्य सरकारला मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.नवीन संस्थांना परवानगी देण्यासाठी सरकारला कृषी पतपुरवठा संस्थांबाबत २३ सप्टेंबर २०१३ साली घेतलेल्या अध्यादेशात दुरुस्ती करणे गरजेचे होते. त्यानुसार पतपुरवठा संस्थेच्या निकषात बदल करण्यात आले आहेत. आता नियोजित प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेने नोंदणीपूर्वी ५ लाख रुपयांचे भाग भांडवल जमा करणे आवश्यक आहे. तसेच नोंदणीनंतर एक वर्षाच्या कालावधीत किमान एक व्यवसाय सुरू करण्याचे बंधन घातले आहे, असे निकष पूर्ण केल्यास एका गावात एकाहून अधिक संस्था सुरू करता येतील.(प्रतिनिधी)
गावात आता कितीही पतपुरवठा सोसायट्या
By admin | Updated: February 15, 2017 02:16 IST