बारामती : वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही कोणताच प्रतिसाद न देणाऱ्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांविरोधात आक्रमक होत महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम आणखी तीव्र केली आहे. गेल्या दोन दिवसांत बारामती परिमंडलातील मोठ्या थकबाकीदारांसह ११५१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यांसह सोलापूर, सातारा जिल्ह्यांत दरमहा वीजबिलांची वसुली ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा कमी झालेली आहे. सद्यस्थितीत महावितरणची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून, थकबाकी वसुलीशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही. वसुलीअभावी वीजबिलांच्या थकबाकीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने थकबाकीदार सर्वच छोट्या-मोठ्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थकीत वीजबिलांच्या वसुली कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचीसुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. बारामती परिमंडलातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजना, पथदिवे व शासकीय कार्यालये या वर्गवारीतील २२७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे ४ कोटी ४२ लाख रुपये थकबाकी आहे. दरम्यान, २२० ग्राहकांनी ४२ लाख ४१ हजार रुपये थकबाकी भरली आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ९२४ ग्राहकांचा वीजपुरवठा ५५ लाख ४१ हजार रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला आहे. दरम्यान, या वर्गवारीतील १४ हजार ८८७ ग्राहकांनी ३ कोटी रुपयांची थकबाकीभरली आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणने १ फेब्रुवारीपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीज थकबाकीदारांना झटका
By admin | Updated: February 5, 2017 03:19 IST