खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आळेफाटा येथील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, रवींद्र मिर्लेकर, शरद चौधरी, माऊली खंडागळे, स्वाती ढोले, नगराध्यक्ष शाम पांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय राऊत म्हणाले, राज्यात ५५ ठिकाणी भगवा फडकला पण जुन्नरला फडकायला हवा तिथे नाही फडकला, याची ती खंत आम्हाला राहील. शिवसेना हे एक मंदिर आहे डोक्यात राग घालून जायचे आणि परत यायचे, असे करू नका. आपले एकच कुटुंब आहे जो शिवसेनेतून गेला तो दुसऱ्या घरात सुखी होत नसतो जी बोचकी बाहेर गेली ती परत आली तरी परत घ्यायची नाहीत.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात शिवसैनिकांनी गोरगरिबांना दिलासा दिला. मागील लोकसभा, विधानसभेला अपयश आले असले तरी कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने तयारी लागावे. बैलगाडा शर्यतीच्या विषयावरून खासदार अमोल कोल्हेंवर टीका करताना ते म्हणाले, दोन वर्षे झाली, पण घोडी कुठे गेली माहितच नाही. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य असूनही निधी मिळत नाही. कारण एकाच पक्षाची दादागिरी जिल्हा परिषदेमध्ये आहे.
माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले, आपल्या भांडणाने समोरच्याचा फायदा होतो. जी माणसे समाजात वावरत नाही. ज्यांचे मोबाईल चोवीस तास बंद असतात, पुण्या-मुंबईला जाऊन राहतात आणि फिरायला जुन्नर तालुक्यात येतात, अशा लोकप्रतिनिधीना घरचा रस्ता दाखवा असे आवाहन करतानाच विद्यमान आमदारांचं नाव न घेता चिमटा काढला.