दिवे : पाणी जपून वापरा, पाणी काटकसरीने वापरा, नळाला तोट्या बसवून घ्या, अशी सासवडकर नागरिकांना परिचित असणारी दवंडी दर वर्षी सासवड नगरपालिकेकडून सर्व नागरिकांना ऐकविण्यात येते. मात्र, याच नगर पालिकेच्या नळ जोडण्यांमधून गळतीमुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. संबंधित विभागाचे याकडे मात्र दुर्लक्ष आहे. नगरपालिका कार्यालयासाठी २४ तास पाण्याचे कनेक्शन आहे. त्यामधून हे पाणी वाया जाते. सासवडकरांना गेली कित्येक वर्षे नेहमी दिवसाआड पाणी सोडले जात आहे. वर पाणीबचतीचे उपदेश केले जातात. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी सामान्य माणूस वणवण फिरत असतो. पण नगरपालिका स्वत:च्या नळजोडाबाबत गळती होत असली तरी उदासीन का, हे मोठे कोडे आहे. पाणी बचत झाली पाहिजे हे सर्वांना मान्य आहे. पण नगरपालिकेनेच आपल्या लाईन तपासून पाहिल्यास अशा गळणार्या लाईनमधून अशुद्ध पाणीपुरवठा होऊन पाण्याद्वारे अनारोग्य पसरू शकते याची जाण असावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
सासवडला दररोज हजारो लिटर पाणी वाया
By admin | Updated: May 28, 2014 00:27 IST