पुणे : महापालिकेने मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी कारकस प्रकल्प उभारला आहे. मात्र, पर्यावरण विभागाने आक्षेप घेतल्याने प्रकल्प बंद आहे. प्रकल्प सुरू करण्याविषयी आतापर्यंत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ५० वेळा पत्र दिले. प्रत्येक पत्रामध्ये पूर्वीच्या पत्राचा उल्लेख केला. मात्र, मुख्यमंत्र्यांकडे हा विषय प्रलंबित आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केले. महापालिकेच्या महात्मा फुले सभागृहातील व्हिडोओ कॉन्फरन्सचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी महापौर चंचला कोद्रे, स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे, आयुक्त विकास देशमुख व नगरसेवक उपस्थित होते. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा सुळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, ‘‘शहरातील कचरा व्यवस्थापनाचा विषय महत्त्वाचा आहे. महापालिकेतर्फे पाच ठिकाणी कचराप्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार होते. मात्र, अद्याप दोनच जागा ताब्यात आल्या असून, त्याठिकाणी प्रकल्प उभारण्याची कार्यवाही तातडीने करण्याची गरज आहे. शहरातील सर्वाधिक कचरा उरुळी देवाची व फुरसुंगी येथे डंपिंग केला जातो. त्याठिकाणी असलेला हंजर प्रकल्प वारंवार बंद पडतो. त्यामुळे ग्रामस्थ आंदोलन करतात. महापालिकेने कचरा प्रकल्पासाठी पाच जागांची पाहणी केली. मात्र, त्यापैकी दोन जागा ताब्यात आल्या असून, उर्वरित तीन जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. पुढील २० महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून कचऱ्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे, असे सुळे यांनी सांगितले. सिंचन घोटाळा, एलबीटी आणि पाणी या विषयांवरही पक्ष पातळीवर निर्णय होत असल्याचे सांगत थेट उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. (प्रतिनिधी)
कारकस प्रकल्पासाठी ५० वेळा स्मरणपत्रे...
By admin | Updated: June 17, 2014 02:18 IST