अनुराधा राजहंस : ज्ञानेश्वर निकम यांच्या चित्रांचे प्रदर्शनपुणे : जी व्यक्ती स्वत:ची गरज किंवा अडचण दूर करण्यासाठी कलेचे प्रदर्शन करते ती गरजवंत असते. परंतु जी रसिकांच्या आनंदासाठी एखादी कला साकारते तीच खरी कलावंत असते, असे मत गायिका अनुराधा राजहंस यांनी व्यक्त केले.सातारा जिल्ह्यातील चित्रकार ज्ञानेश्वर निकम यांच्या ग्रामीण भागातील नयनरम्य निसर्गदृश्यांच्या चित्रांंचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आले असून, त्याचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कृष्णाकाठावरून होणारे पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन आणि पानगळ झालेल्या झाडांच्या सोबतीने होत असलेला सूर्यास्त हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे. हे प्रदर्शन २८ मेपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ८ या वेळेत खुले राहणार आहे.(प्रतिनिधी)या प्रदर्शनामध्ये कृष्णाकाठावरून दिसणाऱ्या पौर्णिमेचे मनोहारी दृश्य, वेण्णा नदीच्या संगमावर वसलेले माहुली घाट मंदिर, आदिवासी घरे, भिगवण धरण, छत्रपती उदयनराजे भोसले यांचा जलमंदिर पॅलेस, अदालत राजवाडा, प्रतापगड, फलटणच्या श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकरांचा मनमोहन पॅलेस, शिखर शिंगणापूरचे शंभू महादेवाचे मंदिर, कोकणातील निसर्ग, पावसाळी दिवसातील कृष्णाकाठ, रात्रीच्या वेळी चंद्रप्रकाशात दिसणारी कृष्णा नदी, राम-रावण संग्रामाचे रचनाचित्र अशी विविध चित्रे या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात.