लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उत्तर कर्नाटक त विदर्भ दरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम गुरुवारी राज्यात सर्वत्र दिसून आला आहे. विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पहाटेपासून गारांसह पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर पुण्यासह अनेक ठिकाणी गारपीट, वादळी वार्यासह पाऊस झाला. शुक्रवारीही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. विदर्भात आज पहाटेपासून गारपिटीसह अनेक ठिकाणी पाऊस झाला.
गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत राज्यात सांगली ८, सातारा, ३, कोल्हापूर २, तिरोरा ७, गोंदिया ६ मिमी पावसाची नोंद झाली होती. राज्यात बहुतांश ठिकाणी आज दिवसभर आकाश ढगाळ होते. दुपारनंतर पुणे, नाशिक, निफाड, सटाणा, सातारा, महाबळेश्वर, पणजीसह विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडला.
सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ब्रम्हपूरी १५, नागपूर ३, वर्धा ३, बुलढाणा ३, महाबळेश्वर ३, पणजी ०.२ मि मी पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारी १९ फेब्रुवारी रोजी पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.