मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्याविरोधात तीन अधिका:यांनी तक्रारी दिल्यानंतर आता तक्रारींचा ओघच लागण्याची शक्यता आहे, असे वरिष्ठ आयपीएस अधिका:यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला आपल्या कनिष्ठ अधिका-याला अनुपस्थित राहण्यास सांगून दयाळ यांनी गृह खाते आणि राजकारण्यांशी वैर ओढवून घेतल्याची आणि त्यांनी केलेल्या कथित अन्यायाची चर्चा बुधवारी आयपीएस मेसमध्ये रंगली होती.
दयाळ यांच्याविरोधातील तक्रारींची ही सुरुवात आहे. अनेक कनिष्ठ अधिकारी आणि सहकारी तक्रारी करम्याची शक्यता आहे. दयाळ एक प्रामाणिक अधिकारी आहेत. पण त्यांना वाटते की आपणच एकटे प्रामाणिक आहोत आणि अन्य सगळे अप्रामाणिक आहेत, असे एका महानिरीक्षक दर्जाच्या अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
दयाळ अनेक ज्येष्ठ अधिका-यांपासून कनिष्ठांर्पयत किरकोळ कारणांवरून मोठी कारवाई करत आले आहेत. एक महिला लिपिक त्यांना एका प्रकरणी न्यायालयात हजर राहण्याची आठवण करून देण्यास विसरली म्हणून त्यांनी तिला तडकाफडकी बडतर्फ केले. एका अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिका-याला तो प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस कामावर गैरहजर राहिल्याबद्दल लेखी समज दिली. इतक्या ज्येष्ठ अधिका-याला वागणूक देण्याची ही पद्धत नव्हे. अनेक इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारीही त्यांच्या चुकीच्या पद्धतीने बदल्या केल्याबद्दल नाराज असून तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. (प्रतिनिधी)