प्रवीण गायकवाड, शिरूर - औद्योगिकीकरणाच्या विकासाची फळे चाखायला मिळण्याऐवजी कारखान्यांच्या दूषित पाण्यामुळे सरदवाडी, फलकेमळा, नवलेमळा, सरोदेवस्ती आदी भागांतील नागरिकांना मुतखडा आजाराला सामोरे जावे लागले. तर आजही अनेक नागरिकांना पोटाचे विकार सुरूच असल्याचे चित्र आहे. काही करा हे दूषित पाणी आपल्या ओढ्याला येण्याचे बंद करा, अशी विनवणी या गावातील महिला सत्ताधार्यांकडे करीत आहेत. पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी दूषित झाल्याने या गावातील शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर काही ठिकाणी पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत आहे. हा त्रास कमी म्हणून की काय शारीरिक व्याधींनीही या गावच्या नागरिकांना जखडले आहे. यांपैकी बहुतांशी गावांतील नागरिकांना मुतखड्याच्या आजाराला सामोरे जावे लागले आहे. याबरोबरच पोटात दुखणे, मळमळणे, ताप, उलट्या आदी प्रकारचे विकारही या नागरिकांना जडले, आजही अनेकांना या विकाराला सामोरे जावे लागत आहे. फलकेमळा येथील नर्मदा फलके या महिलेला मुतखड्याचा आजार जडल्याने प्रचंड त्रास झाला, मुतखड्याची शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या गावाला पिण्यासाठी एमआयडीसीकडून पाणी मिळते. मात्र जुनी माणसे आजही विहिरींचेच पाणी पिण्यासाठी वापरतात. याचा परिणाम आजार बळावतोय. दूषित पाण्यामळे गावातील अनेक जनावरे दगावली आहेत. या पाण्यामुळे महिलावर्ग नाराज असून तुम्हाला निवडून दिले, या पाण्याचा बंदोबस्त करा नाहीतर कोणाला भेटून सांगायचे ते सांगा, असे आम्हाला सतत बजावत असल्याचे फलके यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्या रोहिणी फलके यांनीही यास दुजोरा दिला. महिला बचत गटाच्या महिला आंदोलन करून हा प्रश्न सोडवू या निर्णयाप्रत आल्याचेही फलके यांनी सांगितले. याबाबत द्वारकाबाई फलके, सदाशिव नवले, सुनीता नवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एमआयडीसी प्रशासनाने या कारखान्यांच्या दूषित पाण्याची दखल घेणे गरजेचे आहे. मात्र, त्यांचाही शुद्धीकरण प्रकल्प बंद असून त्यांच्याकडे आलेले दूषित पाणी (कारखान्यांचे) तेच आहे, तसेच ओढ्यात सोडत आहेत.
मुतखडा, पोटाच्या विकाराने ग्रामस्थ त्रस्त!
By admin | Updated: May 27, 2014 07:11 IST