जेजुरी : बेलसर (ता. पुरंदर) येथील सुमारे ३८३ गारपीटग्रस्त शेतकर्यांचे कृषी विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, केवळ ८३ शेतकर्यांनाच भरपाई देण्यात आल्याने येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. माजी सरपंच नीलेश जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली सरपंच हनुमंत जगताप, माजी सरपंच राहुल आबनावे, रोहिदास जगताप, तुषार कुडले, प्रमोद जगताप, हनुमंत जगताप, कैलास जगताप यांनी काल पुरंदरचे तहशीलदार संजय पाटील तसेच कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांची भेट घेऊन इतर पंचनामे झालेल्या शेतकर्यांनाही नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसे नुकसानग्रस्त शेतकर्यांचे एक निवेदन ही देण्यात आले आहे. मार्च महिन्यात व त्यानंतर ही पुरंदर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकर्यांचे फळबागा, भाजीपाला व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. तहसीलदार आणि कृषी खात्याच्या अधिकार्यांनी संपूर्ण तालुक्यात दौरा काढून पाहणी केली होती. संयुक्तपणे पिकांच्या नुकसानीचे पंचनामेही केले होते. यात फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. बेलसर येथील सुमारे ३८७ शेतकर्यांचे नुकसान झाले होते. यामध्ये डाळिंबाच्या फळबागांचे अधिक नुकसान झाले होते. त्या सर्वांचे पंचनामेही झाले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ८३ जणांनाच नुकसान भरपाई मिळाली आहे. या संदर्भात पुरंदरचे तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. बेलसरचे कृषी सहाय्यक पी. डी. धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र ज्यांचे नुकसान ५० टक्कयांपेक्षा जास्त झाले आहे. त्यांनाच नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यांचे नुकसान ५० टक्कयापेक्षा कमी असल्यानेच मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
पंचनामे ३८७; भरपाई ८३ जणांनाच
By admin | Updated: May 20, 2014 23:38 IST