वाघोली : गावकऱ्यांनी विकासकामात समन्वय साधून सहमताने कामे केल्यास गावच्या विकासास वेग येईल. तसेच केसनंद गावकऱ्यांनी विकासकामासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे विशेष कौतुक आहे. या खुल्या केलेल्या पाणंद रस्त्याचा फायदा ५० हून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. यापुढेही ग्रामस्थांनी असाच समन्वय साधून गावच्या विकासासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॅा. राजेश देशमुख यांनी व्यक्त केली.
केसनंद (ता. हवेली) येथील पाणंद रस्ता खुला करण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंअंतर्गत दोन पाणंद रस्ते जिल्हाधिकारी यांचे हस्ते खुले करण्यात आले.
यावेळी वाघोली मंडळ क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,पोलीस विभाग व निर्वाचित लोकप्रतिनिधी यांच्या सोबत ग्रामपंचायत सभागृहात बैठक पार पडली. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांचा नवनिर्वाचित सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डाॕॅ. राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी संजय तेली,तहसीलदार विजयकुमार चौभे,तालुका वैद्यकीय आधिकारी सचिन खरात,गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,
अधिकारी,मंडल अधिकारी किशोर शिंगोटे,तलाठी बाळासाहेब लाखे ,केसनंदच्या सरपंच रोहिणी सचिन जाधव,उपसरपंच सुनिता दिनेश झांबरे,मिलिंद हरगुडे,वाघोली सरपंच वसुंधरा उबाळे यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांकरिता केलेली कार्यवाही व अडचणी जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतल्या. यात सुधार आणण्याकरिता अधिकाधिक विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करणे आदींबाबत त्यांनी सूचना दिल्या. तर या वेळी प्रशासकांनी मांडलेल्या अडचणींवर अपेक्षित सहकार्य व निधी तत्काळ देण्यात येईल, याची ग्वाही दिली आहे. सूत्रसंचालन प्रमोद हरगुडे, तर प्रस्तावना मिलिंद नाना हरगुडे यांनी केले. रोहिणी सचिन जाधव यांनी आभार मानले.