मंचर : मामाच्या गावाला जाण्यासाठी एकट्याच घराबाहेर पडलेल्या पाच व तीन वर्षांच्या मुली भरकटत गेल्या. त्यानंतर त्यांची तब्बल नऊ दिवसांनी वडिलांबरोबर भेट झाली. मंचर पोलीस ठाण्यात या दोन मुलींना त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले. भराडी गावातील सत्यवान धोंडीभात्न पारधी यांचे एकटेच घर आहे. जंगलात असलेल्या घरात पारधी मुलींसह राहतात. रविवारी (दि.१२ ) रोजी पारधी बाजार करण्यासठी मंचर येथे आले. त्या वेळी घरी शारदा (वय ५) व रविना (वय ३) या दोन मुली होत्या. आई-वडील बाजाराला गेल्यानंतर दोन्ही मुलींनी मामाच्या गावाला जायचंय म्हणून त्या घराबाहेर पडल्या. चुकून त्या भरकटल्या गेल्या. निरगुडसरमार्गे दोन्ही मुली सायंकाळी गावडेवाडी पिंपळमळा येथे आल्या. सोमवारी सकाळी जि. प. सदस्य दादाभाऊ पारधी व कांताराम केदारी यांनी या मुलींना ताब्यात घेऊन दादाभाऊ गोविंद केदारी या शिक्षकाकडे सांभाळण्यास दिल्या. दोन्ही मुलींना नाव व पत्ता सांगता येत नव्हता. त्यामुळे त्याच्या पालकांचा शोध लागत नव्हता.या दरम्यान शिक्षक केदारी यांनी मुलींना सांभाळूून त्याच्या पालकांचा शोध सुरू ठेवला. पोलिसांना मुली सापडल्याची माहिती दिली. भराडी येथील मुलीच्या वडिलांना या मुली मंचर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आज सकाळी वडील सत्यवान धोंडीभात्न पारधी, किसन आबासाहेब गावडे यांनी शिक्षक दादासाहेब केदारी यांची भेट घेतली. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे, राजू कांबळे, सागर गायकवाड यांनी शारदा व रविना या दोन्ही मुलींना मंचर पोलीस ठाण्यात आणले व नंतर त्यांना वडिलांच्या स्वाधीन केले. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना हा प्रकार समजला. तेव्हा त्यांनी दोन्ही मुलींचे पालकत्व घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, मुलीच्या वडिलांनी मुलींना घरी नेले. या मुलींना श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कपडे देण्यात आले. (वार्ताहर)
नऊ दिवसांनंतर चिमुरड्या वडिलांकडे
By admin | Updated: June 21, 2016 00:29 IST