पिंपरी : मावळातून महायुतीला भरघोस मताधिक्य मिळाले, तर मावळात नवखा पक्ष असलेल्या शेकापच्या उमेदवाराला तब्बल पन्नास हजार मते मिळाली. राष्ट्रवादीचा उमेदवार थेट तिसर्या क्रमांकावर फेकला गेला. यामुळे विधानसभा काबीज करून मावळात पाय रोवू पाहणार्या राष्ट्रवादी काँगे्रसचे चांगलेच धाबे दणाणले आहे. गेली २० वर्षे भाजपच्या ताब्यात असलेली विधानसभा यंदा तरी राष्ट्रवादीच्या ताब्यात येणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे बारणे यांना मावळ विधानसभा मतदारसंघातून ८९ हजार मते पडली. त्याखालोखाल शेकापचे लक्ष्मण जगताप यांना ४८ हजार मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर अवघी ३१ हजार मते मिळवीत तिसर्या स्थानावर राहिले. पुणे जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसला मावळची जागा अद्यापही काबीज करता आलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सर्व शक्तिनिशी उतरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदारसंघात बारकाईने लक्ष घातले. आपल्या उमेदवाराला मताधिक्य मिळण्यासाठी जोरदार प्रचारयंत्रणा राबविली. नेत्यांचीही मोठी यंत्रणा कामाला लावली. मात्र, त्यामध्ये यश आले नाही. त्यातच गेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना थांबवून बापू भेगडे यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांना अपयश आले. त्याच बापूंनी लोकसभा निवडणुकीत जगताप यांना मुक्तहस्ते मदत केली. त्यामुळे मतदारसंघात कसलीही ओळख नसतानाही शेकापच्या जगतापांना ४८ हजार मते मिळाली. मात्र, तरीही जगतापांचा पराभव झाला. जगतापांना यश मिळाले असते, तर मावळातून याचा थेट फायदा बापूंना झाला असता. विधानसभा निवडणुकीत बापूंना पूर्ण ताकत देऊन रिंगणात उतरविण्याचा मानस होता. मात्र, तसे न झाल्याने बापूंच्या विधानसभा निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बापू काय निर्णय घेतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांची सर्व यंत्रणा कामाला लागली असतानाही राष्ट्रवादीचा उमेदवार तिसर्या क्रमांकावर फेकला जातो, तर दुसरीकडे बापू भेगडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळलेल्या जगताप यांना दुसर्या क्रमांकाची मते मिळतात. यावरून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला कसरत करावी लागणार, हे स्पष्ट होते. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रचार यंत्रणेत असतानाही अपयश आल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. मावळात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असले, तरी त्याचा निवडणुकीत फायदा झाला नाही. नातेगोते व स्थानिक राजकारणावरच राष्ट्रवादीला मते मिळाली आहेत. माऊली दाभाडे, बबन भेगडे, बाळासाहेब नेवाळे हे विधानसभेसाठी तयारीत आहेत. मात्र, बापू भेगडे यांच्या आताच्या भूमिकेमुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार नक्की कोण असेल, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असतानाही विधानसभा, लोकसभा हातात येत नसल्याचे शल्य राष्ट्रवादी नेत्यांच्या मनात आहे. मात्र, स्थानिक पदाधिकार्यांमध्ये बेबनाव असल्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसत आला आहे. मावळात महायुतीचे वर्चस्व कायम राहिल्याने त्याचा मोठा फायदा महायुतीच्या पदाधिकार्यांसह आमदारांना होणार आहे. मावळातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यास फायदा होणार आहे.
कमी मते मिळाल्याने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले
By admin | Updated: May 19, 2014 02:23 IST