पिंपरी : विशेष मतदार मोहिमेअंतर्गत मतदार नावनोंदणी करण्यासाठी सोमवार अखेरच्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केंद्रावर नागरिकांनी रांगा लावून अर्ज दाखल केले. प्रथमच मतदानाचा हक्क मिळणार असल्याने अर्ज सादर करताना तरुण-तरुणींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. काल रविवार साप्ताहिक सुटीच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. याच त-हेने आज सोमवारी अखेरच्या दिवशीअर्ज देण्यासाठी नागरिकांनी केंद्रावर गर्दी केली होती. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्ज घेऊन सकाळपासूनच केंद्रात हजर झाले होते. ओळखपत्रासाठी पॅनकार्ड, वाहन परवाना, आधार कार्ड, रहिवाशी पत्तासाठी वीजबिल, रेशनकार्ड आणि जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा किंवा महाविद्यालयाचा दाखला, भाडे करारपत्र, लग्नपत्रिका आदी कागदपत्राच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडाव्या लागत होत्या.अपुऱ्या कागदपत्रांचे अर्ज स्वीकारले जात नव्हते. त्यासाठी नागरिकांना दोन ते तीन वेळा केंद्रात हेलपाटे मारावे लागले. यामध्ये तरुण - तरुणींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. अर्ज स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून पावती मिळाल्यानंतर मतदानाचा हक्कच प्राप्त झाल्याने एकमेकांना टाळ्या देत, उड्या मारत ते आनंद व्यक्त करीत होते.कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. छोट्या छोट्या चुका काढत पुन्हा अर्ज भरण्यास आणि आवश्यक कागदपत्रे जोडण्याची सक्ती केली जात होती. कर्मचाऱ्यांकडून उद्धट वर्तवणूक मिळत असल्याने अनेकांनी अर्ज न भरताच माघारी जाण्याचा निर्णय घेतला. अनेक ठिकाणी रांगेत उभे राहूनही सायंकाळचे ५ वाजल्याचे कारण देत अर्ज स्वीकारण्यास थेट नकार दिला गेला. त्यामुळे अनेकांना नाराजी होऊन घरी परतावे लागले. ही विशेष मतदार नोंदणी मोहीम ९ ते ३० जून या २१ दिवसांच्या कालावधीसाठी राबविली गेली. दाखल अर्जाची छाणणी करण्यात येणार आहे. मतदार यादीसंदर्भात असलेले दावे १५ जुलैपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. दाखल झालेल्या अर्जाचे डाटा एट्रीचे काम २५ जुलैपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. ३१ जुलैला अंतिम मतदारयादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर १ आॅगस्टपासून पुन्हा मतदार नावनोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
अखेरच्या दिवशी मतदारराजा झाला जागा
By admin | Updated: July 2, 2014 01:58 IST