कापूरव्होळ : भोर तालुक्यातील १० वर्षांपूर्वीचा जमिनीचा भाव आणि आताचा असणारा जमिनीचा भाव यांमध्ये जमीन-असमानचे अंतर पडले आहे. वतनी किंवा पुनर्वसन जमिनीचा शोध घेऊन होणारे खरेदी-विक्री व्यवहार दलाल आणि अधिकार्यांसाठी ‘चरण्याचे कुरण’ ठरत असल्याने भोर तालुक्यातील जमिनीचा सोन्यापेक्षाही जास्त भाव खात आहे. गेल्या काही वर्षांत नीरा देवघर व चाफेट धरण कालव्यांचे विकासकरण, सहापदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग, पर्यटनस्थळ घोषित, औद्योगिक प्रकल्पाच्या वावड्या या इत्यादी कारणांमुळे येथे वेगाचा विस्तार विकास होईल. याचा परिणाम केवळ जमिनीचे भाव वाढण्यावरच नव्हे, तर अर्थकारण, राजकारणावर झाला आहे. परिणामी, खरेदी- विक्रीच्या माध्यमातून आर्थिक मलिदा लाटण्याकडे कल दिसत आहे. सध्या भोर तालुक्यात बनावट कागदपत्रांच्या साह्याने जमीन खरेदी-विक्री करणार्यांचा सुळसुळाट झाला आहे. वेल्हे तालुक्यात तर काही ठिकाणी एक जमीन ३ ते ४ जणांनी खरेदी केलेली सर्च रिपोर्टमध्ये दिसून आली. काही ठिकाणी भोर तालुक्यात बोगस बनावट कागदपत्रांच्या साह्याने जमीन खरेदी-विक्री होतच आहे. कापूरव्होळ, पेंजळवाडी, वेळवंड खोरे व वीसगाव खोर्यात अशा ठिकाणी बोगस खरेदी खते दिसून येत आहेत. भोरमध्ये १०० एकरांपेक्षा जास्त जमिनी एका व्यक्तीच्या नावावर खरेदी केल्याचे दिसून येत आहे. अशा खरेदीदारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या व्यवहारामध्ये पुणे-मुंबई तसेच इतरही अनेक शहरांमधून लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करत अल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर मोठे अधिकारी, उद्योगपतीही याठिकाणी जमिनी खरेदीसाठी मोठे व्यवहार करत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
भोर तालुक्यावर लँडमाफियांचा डोळा
By admin | Updated: May 18, 2014 23:56 IST