कोरेगाव भीमा :
चासकमान विस्थापितांसाठी तब्बल ७५० एकर जमीन (तीनशे हेक्टर) देणाऱ्या कोरेगाव-भीमा (ता. शिरूर) ग्रामस्थांना चासकमान खाते आता पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी पाणीउचल परवानगी देईना. विशेष म्हणजे कोरेगावकरांनी आपल्या कुशीत नवीन गाव म्हणून वाडा-पुनर्वसन गाव सन १९८७ मध्ये आनंदाने वसवून घेतले. मात्र हा त्यागच कोरेगावकरांसाठी दुर्दैवाचा फेरा ठरल्याने गावात मोठा जनक्षोभ वाढत चालला आहे.
चासकमान धरणग्रस्तांसाठी १९८७ साली कोरेगाव भीमा या ठिकाणी तब्बल साडेसातशे एकर जमीन (तीनशे हेक्टर) धरणग्रस्तांना वाटप करण्यात आली. त्याचबरोबर कोरेगावकरांनी आपल्या कुशीत वाडा पुनर्वसन नावाचे नवीन गाव तयार करण्यात आले. शेकडो एकर गावची जमीन चासकमानसाठी कवडीमोल किमतीत शेतकऱ्यांची जाऊनही शेतकऱ्यांसाठी पाण्याचा कोणताही पक्क्या कॅनॉलची या ठिकाणी निर्मिती तर पाटबंधारे विभागाने केली तर नाहीच शिवाय शेतीसाठीही वेळवर पाणी उचलताही येत नाही. याबबात आमदार अॅड. अशोक पवार यांच्याकडे ग्रामस्थांनी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
कोरेगाव भीमासारख्या औद्योगिकदृष्ट्या मोठ्या ग्रामपंचायतीने १९८५ साली वढू खुर्द येथे विहीर, पाण्याच्या टाक्याद्वारे गावाला पाणीपुरवठा करण्यात आला. २०१० साली या ठिकानी सँड फिल्टरद्वारे शुध्द पाणीपुरवठा केला. मात्र पस्तीस वर्षांपूर्वीची विहीर व २०१० सालचा प्रकल्प वाढत्या लोकसंख्येमुळे अपुरा पडू लागला आहे. गावाला गायरान व गावची जागा नसल्याने मोठा शुद्ध पाणी प्रकल्प करता येत नाही. गावच्या उपयोगासाठी वनक्षेत्राची जागा मिळत असल्याने जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पुन्हा पाणी योजनेचा प्रस्ताव तयार करुन वढू बंधाऱ्यातून पाणी उचलण्याची परवानगी पाटबंधारे विभागाकडे मागितल्यावर तेथील अभियंता विजय फुंदे यांनी पाणी उचलण्याची परवानगी देता येणार नसल्याचे सांगितले.
धरणात साठा नसल्याने परवानगी देता येत नाही
पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वाघोली योजना व इतर योजनांमुळे साठा शिल्लक राहत नसल्याने पाणी उचलण्याची परवानगी देता येणार नसल्याचे सांगत चासकमान कालव्यातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी उचलून ते साठवण तलाव करुन त्यात पाणी सोडण्यासाठी परवानगी देता येईल, असे पाटबंधारे खात्याचे विजय फुंदे यांनी सांगितले.
आमचंच गाव वंचित का?
भीमा नदीवरून वाघोली, लोणी कंद, सणसवाडी, पेरणे अनेक गावांच्या पेयजल योजना व अनेक खाजगी उद्योगांना पाणी उचलण्याची परवानगी दिली असताना आमच्या गावची चासकमान धरणग्रस्तांसाठी साडेसातशे एकर जमीन जाऊनही या धरणाच्या पाण्यापासून आमचंच गाव वंचित का? असा सवाल सरपंच अमोल गव्हाणे यांनी केला आहे.