लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : भेटीलागी जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी॥
आषाढी पायी सोहळा म्हटलं की वारकरी ऊन, पाऊस, थंडी अन्य कशाचीही तमा न बाळगता माऊलींच्या सोहळ्यात पायी चालतो. कारण पंढरीच्या विठुरायाची त्याला ओढ लागलेली असते. काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घेत नाहीत. निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच. विशेषतः भाविक व स्थानिक आळंदीकरांसाठी आनंदाची पर्वणी ठरणारा हा सोहळा असतो. माऊलींच्या आषाढी पायीवारी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होऊन वारीचा आनंद लुटत असतात. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी आषाढी पायीवारी स्थगित करून नियमावलींच्या अधीन राहून बसद्वारे प्रातिनिधिक वारी संपन्न होत आहे. परिणामी या वारीत वारकऱ्यांना, भाविकांना तसेच स्थानिकांना सहभागी होता येत नसल्याने सर्वांना ही वारी दुरूनच अनुभवावी लागत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तब्बल सतरा दिवसांचा आजोळघरातील मुक्काम उरकून आषाढ शुद्ध दशमीला चलपादुकांसह मोजक्या वारकऱ्यांसमवेत सकाळी सव्वानऊच्या सुमारास शिवशाही बसने पंढरीकडे मार्गस्थ झाला. दरम्यान आळंदी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील बहुतांश सर्व रस्ते इतर वाहतुकीसाठी सकाळी सातपासून बंद करण्यात आले होते. नगरपालिका चौक ते वाय जंक्शन या वारीच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करून नागरिकांना रस्त्यावर येण्यास मज्जाव केला होता.
तत्पूर्वी, पालखी प्रस्थान सोहळ्यातील बसमधील माऊलींच्या चलपादुकांचे लांबून का होईना दर्शन घेण्यासाठी तसेच माऊलींना निरोप देण्यासाठी आळंदीकरांनी सकाळपासूनच नगरपालिका चौकातील रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. तर दुतर्फा घऱातून तसेच घरांच्या गॅलरीतून आळंदीकर माउलींच्या दर्शनासाठी उभे होते.
आजोळघरापासून सजविलेल्या बस जुन्या नगरपालिका इमारतीसमोर येताच सर्व उपस्थितांनी माऊली... माऊली... माऊली... नामाचा गजर करत माऊलींच्या पादुकांवर फुलांची उधळण केली. माऊलींचा हा आषाढी सोहळा इंद्रायणीच्या नवीन पुलावरून मार्गस्थ झाल्यानंतर अनेकांनी रस्त्यालाच वाकून माऊलींचे अनोखे दर्शन घेत हात उंचावून सोहळ्याला भावपूर्ण निरोप दिला.
वास्तविक दरवर्षी आळंदीकर माऊलींच्या पायी वारीत सहभागी होऊन कोणी थोरल्या पादुका मंदिरापर्यंत तर कोणी भोसरी फाटा, पुण्यापर्यंत पायी चालत जाऊन सोहळ्याला निरोप देत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनाला तसेच पायी वारीलाही बंदी असल्याने अनेकांना वारीत सहभागी होण्याची इच्छा असूनही दुरूनच वारी अनुभवावी लागली आहे.
चौकट : माऊलींच्या चलपादुका घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसचे (एमएच ०६ बीडब्ल्यू ४३४५) सारथ्य लक्ष्मण पांडुरंग शिरसाठ तर समवेत असलेल्या अन्य एका बसचे (एमएच ०६ बीडब्ल्यू ३६८०) सारथ्य रामचंद्र नामदेव ईघारे यांना करण्याची संधी मिळाली आहे. एसटी सेवेत केलेले प्रामाणिक काम आणि माझी पांडुरंगावर असलेल्या निस्सीम भक्तीचे हे फळ असल्याचे लक्ष्मण शिरसाठ यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
फोटो ओळ : माऊलींच्या दर्शनासाठी तसेच वारी सोहळ्याला निरोप देण्यासाठी जमलेले आळंदीकर. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)
२) आषाढी बसवारी प्रस्थान सोहळ्यानंतर माऊलींच्या मुख्य समाधी मंदिराच्या कलशावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.
३) शिवशाही बसमध्ये सजविलेल्या खुर्चीवर स्थानापन्न केलेल्या माऊलींच्या चलपादुका.
४) पंढरीला आषाढी वारी घेऊन जाणारी शिवशाही बस.
(सर्व छायाचित्रे : भानुदास पऱ्हाड)