निनाद देशमुख ञ पुणेआपले संपूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित करीत असताना टवाळखोरांकडून होणाऱ्या छेडछाडीने जिल्ह्यात महाविद्यालयीन तरुणी त्रस्त झाल्या असून, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने सार्वजनिक ठिकाणी तरुणी अशा टवाळखोरांच्या शिकार होताना दिसत आहे़ गेल्या काही वर्षांमध्ये अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे़ परिसरातील तरुणांकडून सातत्याने होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या भोसरीतील १४ वर्षीय मुलीचा रविवारी अखेर मृत्यू झाला़ १२ दिवस ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती़ या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणचा आढावा घेतला असताना विदारक चित्र समोर आले ़ गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात विनयभंगाच्या ७८१ घटना घडल्या असून, दर वर्षी त्यात वाढ होताना दिसत आहे़ तर, छेडछाडीच्या १२१ घटना घडलेल्या दिसून येतात़ बहुसंख्य वेळा आपल्याला याच वाटेने जायचे आहे़ आज तक्रार केली, तर दुसऱ्यांदा ते आणखी त्रास देतील, या भीतीपोटी कोणीही तक्रार देण्यास पुढे येताना दिसत नाही़ याशिवाय गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात ३६२ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत़ ग्रामीण भागात तरुणी, महिलांना शिक्षण, नोकरीसाठी लांबवर प्रवास करावा लागतो़ अनेकदा खासगी वाहनांनी प्रवास करताना गर्दीचा तरुण गैरफायदा घेतात़ मात्र, बहुतेक वेळा महिला त्याकडे दुर्लक्ष करतात़ त्यामुळे अशा टवाळखोरांचे आणखीनच फावते़ विनयभंग, छेडछाडीचे हे प्रकार प्रामुख्याने एसटी स्थानक, महाविद्यालयाच्या बाहेर होताना दिसतात़ पोलिसांची गस्त असेल, तर टवाळखोरांना आळा बसतो़ पण, त्यानंतर पुन्हा त्यांचे कृत्य सुरू होताना दिसते़ तक्रारपेटी शोभेलाचमहाविद्यालयीन तरुणींना होणाऱ्या त्रासाबाबत माहिती मिळावी, यासाठी ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आपल्या हद्दीतील महाविद्यालयांमध्ये तक्रारपेटी बसविण्याचे आदेश दिले होते़ त्याप्रमाणे जवळपास सर्व महाविद्यालयांत अशा तक्रारपेट्या बसविण्यात आल्या़ सुरुवातीचे काही महिने त्यातील तक्रारीवरून कारवाईही झाली;पण पुढे त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष झाले़ अनेक ठिकाणी आता या तक्रारपेट्या दिसून येत नाही़ गस्तही नाहीमहाविद्यालय भरण्याच्या-सुटण्याच्या वेळी त्या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी, असे आदेशही देण्यात आले होते़ पण, त्याची काही पोलीस ठाण्यांचा अपवाद वगळता इतरत्र अंमलबजावणीच होताना दिसत नाही़ २०१२ मध्ये समाजाला काळिमा फासणाऱ्या बलात्काराच्या प्रसंगाला ८१ महिला बळी पडल्या आहेत. २०१३ मधे १५२ महिला यात होरपळल्या आहेत, तर २०१४ मध्ये १२९ महिला बलात्काराच्या घटनेच्या शिकार झाल्या आहेत. विनयभंगाची १३५, तर छेडछाडीची ३४ प्रकरणे २०१२ ला समोर आलीत. या घटनांमध्येही २०१३ मधे वाढ झाली आहे. जवळपास ३३० महिला यात बळी पडल्या आहेत, तर २०१४ मधे ४९४ महिला विनयभंग आणि छेडछाडीच्या बळी पडल्या. जेजुरीत महिला अत्याचाराचे १२ गंभीर गुन्हे घडले. विनयभंग तसेच छेडछाडीच्या यात ८ घटना घडल्या, तर बलात्काराची १ घटना घडली. यात १२ गुन्हेगारांना अटक झाली. यातील एका घटनेत पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. इतर प्रकरणे आजही न्यायालयीन निर्णय प्रक्रियेत आहेत. गतवर्षी वालचंदनगर (ता. इंदापूर) पोलीस ठाण्यात महिला विनयभंग, छेडछाडीचे १८ गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांतर्गत २५ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये विवाहित महिलांची संख्या १२, तर अविवाहित मुलींची संख्या ६ आहे़ या गुन्ह्यातील आरोपी जामिनावर जरी बाहेर सुटले, तरी त्यांच्यावर तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते़, असे सांगण्यात आले़ नारायणगाव पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी विनयभंग आणि छेडछाडीचे १७ गुन्हे दाखल असून, त्यात १७ जणांना अटक करण्यात आली होती़ २०१३ मध्ये १३ गुन्हे दाखल होते़चाकणला ७...चाकण पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी विनयभंग, छेडछाडीचे ७ गुन्हे दाखल असून, ७ जणांना अटक केली आहे़ बलात्काराचे १० गुन्हे दाखल असून, त्यापैकी ९ गुन्हे उघडकीस आले असून ९ जणांना अटक केली आहे़ बारामती शहरात विनयभंग, छेडछाडप्रकरणी २० गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी सर्व २० आरोपींना अटक करण्यात आली होती.शहर पोलीस ठाण्यांतर्गत बारामती शहर, डोर्लेवाडी, पिंपळी, लिमटेक, गुणवडी हा परिसर येतो. या परिसरातून ३५४ अंतर्गत २० जणांवर गुन्हे दाखल असून, त्यांना अटकदेखील झाली होती, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यांतर्गत विनयभंग छेडछाडप्रकरणी २ गुन्हे दाखल आहेत़ भोर पोलीस स्टेशनमध्ये छेडछाडीचे दोन व बलात्काराचा एक असे तीन गुन्हे दाखल आहेत. छेडछाडीच्या दोन गुन्ह्यापैकी एक आरोपी अटक असून एकाचा तपास सुरू आहे. तर बालात्काराच्या गुन्हातील आरोपीला अटक करून तुरूंगात टाकले आहे. जिल्हा पोलिसांमार्फत वाढत्या गुन्ह्यांची आकडेवारी लक्षात घेता मुली तसेच महिलांमधे जनजागृती करण्यासाठी व्याख्याने घेतली जात आहेत. याबरोबरच शाळा तसेच महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांच्या गस्ती वाढविल्या आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे मर्यादित परिसरातच या गस्ती होत आहेत. पोलीस ठाण्यात महिलांच्या तक्रारी आल्यास त्या त्वरित घेणे गरजेचे आहे. - साधना पाटीलएपीआय, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखामहिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कायद्याने शासनाची आहे. सुरक्षेविषयी जागृतीसाठी महिलांसाठी ज्या समित्या नेमल्या आहेत, त्याची माहिती महिला बालकल्याण विभागामार्फत पोहोचविणे गरजेचे आहे. महिला कायद्यासंबंधी अनेक अधिकारी नेमलेले आहेत. या अधिकाऱ्यांची यादी मोबाईल एसएमएसद्वारे महिलांपर्यंत पोहोचवल्यास आपत्कालीन स्थितीत त्यांना मदत मागता येईल. -अॅड. असुंता पारधे, अध्यक्षा, चेतना महिला विकास संस्था
छेडछाडीने जिल्ह्यात तरुणी त्रस्त
By admin | Updated: January 19, 2015 23:17 IST