वालचंदनगर : वालचंदनगर रत्नपुरी (ता. इंदापूर) येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळातील जंक्शन आनंदनगरशेजारी असलेल्या जमिनीवरील आंब्याच्या झाडांची बेसुमार तोड करण्यात आली आहे. यामुळे ४० वर्षांपासून आंब्याची बाग म्हणून ओळखली जाणारी बाग आता इतिहासजमा झाल्याची चर्चा आहे. संबंधित वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.राज्यात १४ मळ्यांत पाच जिल्ह्यांत सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक व सातारा या जिल्ह्यांत हजारो हेक्टर जमिनी शेती महामंडळाच्या ताब्यात होत्या. सन २००६मध्ये शेती महामंडळाला घरघर लागल्याने १४ मळ्यांतील जमिनीवरील उत्पादन घेणे बंद करण्यात आले. १२ हजार एकर जमिनी वालचंदनगर रत्नपुरी शेती महामंडळाकडे असताना येथील खंडकरी शेतकऱ्यांना त्यातील जमिनीचे वाटप करण्यात आले होते. उर्वरित जमिनी करोडोपतीला कराराने देण्यात आलेली आहे. मात्र, या जमिनीवर शेती महामंडळाने शेकडो एकरांत जागोजागी विविध जातींच्या झाडाची लागवड केलेली होती. ज्या धनदांडग्यांना या जमिनी देण्यात आल्या, संबंधितांनी त्या जमिनी ओलिताखाली येण्यासाठी, उत्पादन घेण्यासाठी पर्यावरण विभागाची कसलीही परवानगी न घेता वृक्षतोड करून मालकी हक्क दाखवून दिला आहे.
आंब्याच्या झाडांची बेसुमार कत्तल
By admin | Updated: February 14, 2017 01:50 IST