नारायणगाव : नारायणगाव-वारुळवाडी गटात विद्यमान जि़ प़ सदस्या आशाताई बुचके, माजी जि. प. सदस्या राजश्री बोरकर, अपक्ष उमदेवार सोनाली पाटे व भाजपाच्या मनीषा पारेकर अशी चौरंगी लढत या गटात आहे़ आशाताई बुचके आपला मतदार संघ सोडून या गटातून निवडणूक लढवीत असल्याने या गटाची लढत प्रतिष्ठेची व अटीतटीची झाली आहे़ या गटाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़ नारायणगाव-वारुळवाडी गट सर्वसाधारण महिला राखीव गटासाठी आरक्षित झाल्याने आशाताई बुचके, राजश्री बोरकर व सोनाली पाटे यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे़ बुचके या तालुक्यातील उमेदवारांच्या जाहीर सभा घेत असल्याने नारायणगाव-वारुळवाडी गटातील प्रचार त्यांची मुलगी व सर्व शिवसैनिक करीत आहेत. पंचायत समितीच्या वारुळवाडी गणात रमेश खुडे या मांजरवाडी येथील तरुणाला संधी दिली आहे, तर नारायणगाव गणातून अर्चना माळवदकर या निवडणूक रिंगणात आहेत़ राष्ट्रवादीच्या राजश्री बोरकर व वारुळवाडी गणातील सुशील सोनवणे, नारायणगाव गणातील प्रीती कोल्हे यांना नातेसंबंध व महिलामंडळाचे जाळे मोठे असल्याने राष्ट्रवादीने त्यांना पुन्हा संधी दिली आहे़ त्यांनी बुचके यांना चांगलेच आव्हान दिले आहे़ मनसेचे उपजिल्हाप्रमुख मकरंद पाटे यांच्या पत्नी सोनाली पाटे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण करून दुसरी फेरी सुरू केली आहे़ प्रत्येक मतदाराशी संपर्क केल्याने त्यांनीदेखील निवडणुकीत आव्हान निर्माण केले आहे. कॉँग्रेसने अधिकृत उमेदवारी जाहिर केली होती. परंतू माघारीच्या दिवशी नलिनी को-हाळे यांनी माघार घेतल्याने याचा लाभ राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे. सत्यशिल शेरकर आणि राजश्री बोरकर यांचे जवळचे नातेसंबंध असल्याने या ठिकाणची उमेदवारी काँगे्रसने मागे घेतली अशी चर्चा या गटात सुरू आहे. तर भाजपाने मनीषा पारेकर यांना संधी दिली आहे. (वार्ताहर)
नारायणगाव वारुळवाडी गटात चौरंगी लढत
By admin | Updated: February 15, 2017 01:51 IST