मंगेश पांडे, पिंपरीकानी पडणारा डीजेचा दणदणाट आणि टोलचा घुमलेला आवाज असे असतानाही संपूर्ण विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही मंडळावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला नाही. आवाज ऐकू येत असतानाही कारवाई होत नसल्याने एकप्रकारे मंडळांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडूनच बळ दिले जात असल्याचे स्पष्ट होते. परिमंडळ तीन हद्दीतील एकाही पोलीस ठाण्याकडून डेसिबलचे उल्लंघन केल्याबाबतची कारवाई झालेली नाही. गणेशोत्सव व्यवस्थित पार पाडा, गोंधळ घालू नका, सतर्क रहा, डीजेंचा वापर करू नका यांना अनेक सूचना पोलीस अधिकाऱ्यांकडून गणेशोत्सवापूर्वी मंडळांच्या कार्यकर्त्यांना दिल्या जातात. वारंवार बैठका घेतल्या जातात. सूचना न पाळल्यास कारवाई करू. मिरवणुकीस परवानगी देणार नाही, असे सुनावले जाते. मात्र, प्रत्यक्षात मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट सुरू असतो. त्या वेळी मात्र कारवाईसाठी पोलीस धजावत नाहीत. न्यायालयाने आवाजाच्या मर्यादा घालून दिल्या आहेत. या मर्यादेचे पालन करूनच ध्वनिक्षेपक लावावेत, असे न्यायालयाचे आदेश आहेत. त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पोलिसांकडून केवळ औपचारिकता म्हणून मंडळांना सूचना दिल्या जातात. पोलिसांचा फौजफाटा केवळ बंदोबस्तासाठीच असतो का, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. डेसिबल मोजण्याचे यंत्र पोलिसांना दिले जाते. मात्र, केवळ शोभेची वस्तू म्हणूनच ते हाताळले जाते. मंडळांवर कारवाई करण्यासाठी पोलीस पुढे येतच नाहीत. कार्यकर्त्यांकडून उत्सवाच्या अगोदरच लाख, दोन लाख रुपये मोजून साऊंडच्या मोठ्या भिंती असलेले डीजेंचे बुकिंग केले जाते. मिरवणुकीत मोठ्या दिमाखात डीजेंचा दणदणाट सुरू असतो. बंदोबस्तावर असलेले पोलीस हे सर्व डोळ्याने पाहत असतात आणि कानाने ऐकत असतात; मात्र जणूकाही ऐकायलाच येत अशीच भूमिका पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत घेतल्याचे पहायला मिळाले. पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी, सांगवी, हिंजवडी अशी ७ पोलीस ठाणी येतात. या ठाण्यांच्या हद्दीत १४०८ मंडळांनी गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली होती.
मंडळांना पोलिसांकडूनच बळ
By admin | Updated: September 12, 2014 03:31 IST