पुणे : आळंदीच्या पाणीप्रश्नाबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. भामा आसखेडमधून पुण्याला जाणाऱ्या पाइपलाइनमधून पाणी मिळण्यासाठी ‘जेएनएनआरयूएम’ व जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करून मंजुरी मिळवू, असे सांगितले. आळंदीच्या पाणीप्रश्नाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे महापालिका, पिंपरी महापालिका व आळंदी नगरपरिषद यांची बैठक झाली. या बैठकीला पुणे महापालिकेचे महापौर दत्तात्रय धनकवडे, कार्यकारी अभियंता गेडाम, पिंपरी महापालिकेचे नगरअभियंता कांबळे, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, नगरसेवक राजेंद्र गिलबिले, प्रदीप नवले, रमेश गोगावले, मुख्याधिकारी विनायक औंधकर, वारकरी प्रतिनिधी राजाभाऊ चौपदार आदी उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेने आळंदी नगरपालिकेला काही मुद्दे उपस्थित करून, आळंदीला या पाइपलाइनमधून पाणी देता येऊ शकत नसल्याचे कळविले आहे. ते मुद्दे आळंदी नगरपालिकेने या वेळी खोडून काढले. मुळात भामा आसखेडमधून आळंदीसाठी 0.१५ टक्के पाणी राखीव आहे. पुणे महापालिकेने पाणी दिल्यास वाढीव कोटा म्हणून त्यांना पाणी मिळेल. आळंदी हे तीर्थक्षेत्र व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने, विशेष बाब म्हणून पाणी देण्यासाठी सरकारकडे प्रयत्न केला जावा. तसेच, प्रस्तूत पाइपलाइनमधून पाणी तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र, पुण्यासाठी १६00 एम. एम. व्यासाच्या पाइपलाइन पाणी वाहून नेणार आहे. मात्र, कमी व्यासाच्या पाइपलाइनमधून नियंत्रित वॉल्व्हद्वारे मीटर लावून आळंदीत पाणी दिल्यास कुठलाही अडथळा येऊ शकत नसल्याचे सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या परवानगीसाठी प्रयत्न करू, असे सांगत, तांत्रिक मुद्यांचा विचार करून पाणी देता येईल का, याबाबत पुणे महापालिकेने विचार करावा. पुन्हा याबाबत बैठक घेऊ, असे सांगितले. (प्रतिनिधी)तर रस्त्यावर उतरू४बैठकीत रोहिदास तापकीर व राजाभाऊ चौपदार यांनी ठोस भूमिका घेत, ‘जर आम्हाला पाणी मिळाले नाही, तर पाइपलाइनचे काम होऊ देणार नाही. तसेच आळंदीकर नागरिक व वारकरी रस्त्यावर उतरतील,’ असा इशारा दिला.
आळंदीच्या पाणीप्रश्नासाठी जलसंपदाकडे पाठपुरावा !
By admin | Updated: March 4, 2015 23:37 IST